पंचवटीतील ‘अमरधाम’मध्ये सुरू केलेल्या विद्युतदाहिनीत गेल्या वर्षभरात ६०० अंत्यविधी करण्यात आले. यामुळे प्रति माणशी ३४० किलो अर्थात तब्बल दोन लाख चार हजार किलो लाकडाची बचत झाली आहे. शहरात महापालिकेच्या अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते. अंत्यसंस्कारासाठी साहित्य मोफत पुरविले जाते. त्यात प्रति माणसी ३४० किलो लाकडाचा अंतर्भाव आहे. अंत्यसंस्कारासाठी वर्षभरात मोठय़ा प्रमाणात लाकडाची गरज भासते. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेने डिझेल दाहिनीचा पर्याय दिला आहे. वर्षभरापूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत विद्युत दाहिनीचा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. पर्यावरणाबाबत नागरिक जागरूक होत असून विद्युत दाहिनीचा वापर हळूहळू वाढत आहे. या प्रकल्पाला नाशिककरांचा प्रतिसाद मिळाला असून विद्युत दाहिनीच्या वापरामुळे लाकडाची मोठय़ा प्रमाणात बचत होत आहे. वायू प्रदूषण कमी होण्यासही मदत झाली आहे. विद्युत दाहिनीतील अंत्यसंस्कारासाठी पाच ते दहा युनिट वीज खर्च होते. नागरिकांनी विद्युत दाहिनीच्या वापराला प्राधान्य दिल्यास पर्यावरण संवर्धनात मोलाचा हातभार लागणार असल्याचे स्मार्ट सिटी कंपनीकडून सांगण्यात आले.