नाशिक : शहरात वेगवेगळ्या भागात गळफास घेऊन तिघांनी, तर रॉकेल ओतून घेत एकाने अशा चार जणांनी आत्महत्या केली. गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विवाहितेसह दोन तरुणींचा समावेश आहे. चारही आत्महत्यांचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पाथर्डी फाटा परिसरातील कविता पाटील (३५, श्रीजी रो हाऊस) या विवाहितेने रविवारी दुपारी राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील शयनगृहात पंख्यास ओढणी बांधून गळफास घेतला. हे लक्षात येताच पती विजय पाटील यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी इंदिरानगर ठाण्यात नोंद करण्यात आली. दुसरी घटना टाकळी रस्त्यावरील जुना कथडा भागात घडली. कोळीवाडय़ात राहणाऱ्या प्रियंका पवार (१८, मरीमाता मंदिराजवळ) युवतीने रविवारी घरात कोणी नसताना छताच्या ओढणीने गळफास घेतला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याच भागात राहणारी संजना हरगावकर (१७, कोळीवाडा) या युवतीने रविवारी दुपारी घराच्या दुसऱ्या मजल्यावर पंख्याला गळफास घेतला. कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या दोन्ही घटना प्रकरणांची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

चवथी घटना इंदिरानगरच्या कॅनॉल रस्त्यावरील झोपडपट्टीत घडली. अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत एकाने आत्महत्या केली. गणेश जाधव असे या व्यक्तीचे नाव आहे. गणेश ६० टक्के भाजल्याने त्याच्यावर बिटको रुग्णालयात प्रथमोपचार करून रविवारी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.