दीड महिन्यात पाच खुनांचा थरार

शहर परिसरात खूनसत्र सुरूच असून या वर्षांच्या पहिल्या दीड महिन्यातच पाच खुनांचा थरार नाशिककरांनी अनुभवला. रविवारी रात्री ११च्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी येथे सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला.

गजानन गावित (३२, रा. बजरंगवाडी) असे मृत सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलजवळ गावित हा रात्री ११ च्या सुमारास थांबलेला असताना हल्लेखोर त्या ठिकाणी दुचाकीवर आले. त्यांनी गावितवर धारदार शस्त्राने वार करून पलायन केले. हल्ल्यात गावितचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली, मुंबईनाका, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गावितवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल होते. या प्रकरणात कोणालाही अटक झाली नसून हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. नाशिक शहर परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.