मनमाड नगरपालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांच्या जाहीर सभांपाठोपाठ आता शिवसेना व बसपाच्या नेत्यांच्याही प्रचारसभांचा श्रीगणेशा झाल्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. मनमाडचा पाणी प्रश्न आणि विकासकामांबाबत जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला तर बसपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, शिवसेना-रिपाइं (आ) युतीच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी चौकात गोऱ्हे यांची सभा झाली. या निवडणुकीत युतीची सत्ता आल्यास शहर विकासाकडे लक्ष दिले जाईल. पाणी वितरण व्यवस्था, भूमिगत गटार योजना आदींचे जे प्रस्ताव शासन स्तरावर आहेत, ते प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. राज्यातील शहरे मोठय़ा प्रमाणात वाढली. लोकसंख्या वाढली. परंतु, नगरपालिकांना पुरेसा निधी नाही. पालिकेतील अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे मतदारांची फसवणूक होत असल्याची टीका त्यांनी केली. बसपाचे सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र मनमाड शहराच्या पाणी प्रश्नासह शहराला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी बसपाला साथ देण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केले. एकात्मता चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा समाचार घेतला. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मनमाडचा पाणी प्रश्न, नागरी सुविधांचा अभाव आणि विविध विकासकामे यांसह स्थानिक समस्यांचा ऊहापोह गरुड यांनी केला.