नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आदिवासी बहुल असलेल्या भागातील किकवारी खुर्द गावातील ग्रामस्थांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांनी गाव कचराकुंडीमुक्त आणि हिरवेगार केले आहे. निसर्गाशी खऱ्या अर्थाने नाते जोडलेल्या या गावाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ‘स्मार्ट ग्राम’ योजने अंतर्गत पारितोषिक मिळविले.

सटाणापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या १३०० लोकसंख्येच्या या गावात हजारो झाडे लावण्यात आली आहेत. गावात प्रवेश करताच वनराईतील भटकंती करत असल्याचा अनुभव मिळतो. अनेक पक्ष्यांचे आवाज आपले स्वागत करतात. पारंपरिक वाड्यांचे सौंदर्य पहावयास मिळते. वैयक्तिक घर असो वा सार्वजनिक इमारत, प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी झाड लावलेले दिसून येते.

गावातील लोकसंख्येच्या कितीतरी पट झाडे येथील ग्रामस्थांनी जगविली आहेत. त्यात सीताफळ, डाळींब, आंबा, आवळा, चिंच, साग, लिंब, नारळ आदी विविध झाडांचा समावेश आहे. आतापर्यंत १२५ हेक्टर पडुक जमिनीचे बागायत रुपांतर झाले आहे. गावात कुऱ्हाड आणि वनचराईबंदी अंमलात आणली. झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन आणि टँकरचा उपयोग करण्यात येतो.
गावाने ‘निर्मल ग्राम योजनेत’ यशस्वीपणे सहभाग नोंदविला. इथल्या प्रत्येक घरात शौचालय उभारण्यात आले आहे. गावात उकिरडा किंवा कचराकुंडी कुठेही दिसून येणार नाही. गावातील प्रत्येक रस्ता अगदी स्वच्छ दिसतो. प्रत्येक घरातून निघालेला कचरा गावात तयार करण्यात आलेल्या नॅडेप पद्धतीच्या कचरा डेपोत टाकण्यात येतो. डेपो भरल्यावर ट्रॅक्टरद्वारे गावाबाहेर तयार करण्यात आलेल्या खतनिर्मिती डेपोमध्ये हा कचरा टाकण्यात येतो. पावसाळ्यात कचऱ्यात पाणी मुरुन त्याचे खतात रुपांतर होते. हे खत शेतीसाठी आणि झाडांसाठी उपलब्ध करून दिले जाते.

nashik-1

गवातील स्मशान परिसरात फुलझाडे व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ग्रामस्थांना केवळ हजार-दोन हजार रुपये दरात लग्नासाठी चहूबाजूने हिरवागार परिसर असलेला हॉल आणि भोजनगृह उपलब्ध करून देण्यात येते. प्लास्टिक निर्मुलन, बायोगॅसचा वापर, घरासमोरील परसबागा, गुटखा विक्री बंदी, दारुबंदी अशा अनेक उपक्रमाद्वारे गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावात आदिवासी बांधवांना शेळ्या पालनासाठी स्वतंत्र व्यवस्था करून देण्यात आली आहे. शेळ्या घराजवळ बांधल्या जात नसल्याने आरोग्याच्या समस्या गावात कमी झाल्या आहेत. अल्पभूधारकांना ग्रामपंचायतीकडील जमीन कराराने शेतीसाठी दिली जाते. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होण्याबरोबर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडली आहे. शाळेचा परिसर देखील हिरवागार आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचे धडे याद्वारे मिळतात. निसर्गाच्या सानिध्यात ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी येथील ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

गावाने भूमिगत बंधारे, माती नालाबांध, बंधारा दुरुस्ती, वनराई बंधारे, वनतळी आदींच्या माध्यमातून जलसंधारणाचे अनेक उपक्रम राबविले आहे. गावात पाणी शुद्धीकरणासाठी उपसरपंच केदाबापू काकुळते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ची यंत्रणा उभी केल्याने श्रम आणि खर्चात बचत झाली आहे. इस्राईल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक घरात समान पाणीपुरवठा करण्यात येतो. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास येथील ग्रामस्थ उत्सुक असतात. एखाद्या पर्यटनस्थळाला लाजवेल अशा निसर्गरम्य परिसरात नव्या युगातील जाणिवा घेऊन येथील नागरिक आपले गाव अधिक ‘स्मार्ट’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गावाच्या नव्या चेहऱ्याविषयी गावातील उपसरपंच केदाबापू काकुळते, म्हणाले की, स्वच्छतेची सवय गावातील प्रत्येक नागरिकाला जडली आहे. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा आनंद ग्रामस्थ घेतात. कचराकुंडीमुक्त गाव असल्याचा आम्हाला अभिमान आहे. नवे तंत्रज्ञान स्विकारुन गावाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून करणार आहोत.

[jwplayer XGc3NHjG]