विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांचे प्रतिपादन जात, धर्म, उपासना पद्धती, लिंग या सर्वाचा भेदाभेद वगळून मानसिक पातळीवर परिवर्तन घडविण्यासाठी भारतमातेचा जयजयकार ही गरज आहे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले. भारतमाता की जय ही केवळ घोषणा नसून जीवनसाधना व महामंत्र आहे. या महामंत्राचा जयजयकार करण्यासाठी मूठ आवळण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय विचार प्रबोधिनीच्या वतीने येथील प्रसाद मंगल कार्यालयात भाजपचे ज्येष्ठ नेते बंडोपंत जोशी यांच्या स्मृतीनिमित्त ‘भारतमाता की जय’ विषयावर घळसासी यांचे व्याख्यान झाले. याच कार्यक्रमात सर्वसामान्यांमध्ये वृक्षांविषयी प्रेम आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणारे आपलं पर्यावरण संस्थेचे प्रमुख शेखर गायकवाड यांचा उत्कृष्ठ कार्यकर्ता पुरस्कार देऊन घळसासी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. घळसासी यांनी व्याख्यानात भारतमातेच्या जयजयकाराची कारणे मांडली. सत्ता, संपत्ती, सामथ्र्य, सौंदर्य याकडे आकर्षित होऊन अलीकडे जयजकार केला जाऊ लागला आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘सैराट’ होय. जयजयकार कोणाचा करावा, तर सद्गुरू आणि मातृभूमी या दोनच गोष्टींचा. मातृभूमीची ओळख टिकविण्यासाठी गरजेच्या गोष्टी आपण स्वीकारायला हव्या. जयजयकाराची ठिणगी आत्मभान विकसित करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार निशीगंधा मोगल, प्रकाश पाठक, नगरसेवक सतीश कुलकर्णी, प्रा. सुहास फरांदे, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते. प्रास्तविक देवदत्त जोशी यांनी केले. सूत्रसंचालन स्वानंद बेदरकर यांनी केले.