नाशिक : जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा ६५० पुढे गेला असला तरी या संसर्गातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळेच आतापर्यंत जिल्ह्य़ातील ६३ जण करोनामुक्त झाले असून यातील सर्वाधिक ५१ रुग्ण हे मालेगाव शहरातील आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
जिल्ह्य़ात आतापर्यंत तब्बल पाच हजार ८०५ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील ४६०७ जणांचे अहवाल नकारात्मक आले. प्राप्त अहवालानुसार नाशिक ग्रामीणमधून दोन, नाशिक मनपा १०, मालेगाव मनपा ५१ असे एकूण ६३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून ५३३ अहवाल प्रलंबित आहेत.
महसूल, आरोग्य, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद सर्वच विभाग उपलब्ध सामग्री आणि मनुष्यबळ पणाला लाऊन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. निरंतर प्रयत्न आणि संयम यावरच ही लढाई जिंकता येईल, असेही मांढरे यांनी सांगितले.
करोनाबाधितांना लवकरात लवकर करोनामुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. लवकरच जिल्ह्यातील करोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढलेला दिसेल, असेही मांढरे म्हणाले.