नाशिक : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या महामार्गविषयक सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपर्यंत कामे पूर्ण करावीत, टोल नाका परिसरातील महामार्गाची कामे विहित वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझा या रस्त्याची दुरवस्था, वाहतूक कोंडीच्या समस्यांविषयी बैठक झाली. टोल नाक्यांची कामे करताना सर्व रस्ते वाहतूक तसेच कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्या कामांत समन्वय ठेवावा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझाची कामे विहीत वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच  १५ ऑक्टोबरपर्यंत टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्यास या टोल नाक्याचे कंत्राट रद्द करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सचिव अन्शुमली श्रीवास्तव यांनी दिली.