नाशिक : पेठ तालुक्यातील शेवटचे टोक म्हणजे आमलोण ग्रामपंचायत. आमलोणसह या ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या वाहनदरीला पाणी मिळवण्यासाठी रात्रभर जागे राहत जंगल परिसरात भटकंती करावी लागत आहे. झिऱ्यातील गाळ उपसत पाण्याचा प्रश्न सोडविण्याची धडपड सध्या सुरू आहे.वाहनदरीत अद्याप वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे परिसरात अन्य शासकीय सुविधांची वानवा. गावाच्या बाजूने वाहतुकीची वर्दळ असली तरी गावाला वेगवेगळय़ा अडचणींना सतत तोंड द्यावे लागते. हा आदिवासी पाडा अंधारातून उजेडात कधी येईल, हे सांगता येत नाही.या ठिकाणी विहीर, शाळा, अंगणवाडी, पीठ गिरणी असे काहीही नसल्याने मुख्य गावात त्यासाठी जावे लागते. या वस्तीवरील काही कुटुंबे बाहेरगावी वीटभट्टी, द्राक्षबाग कामासाठी बाहेरगावी गेले आहेत. वाहनदरीतील लोकांनी वस्तीवर वीज आणण्यासाठी संबंधित आमदारांचे लेखी पत्र घेऊन हरसूल येथील विद्युत कंपनीचे कार्यालय गाठले होते. तीन महिने आधीच हे पत्र दिले होते. तरीही याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.वाहनदरीला तात्पुरती सौर ऊर्जा उपलब्ध झाल्यास किमान विद्युत प्रकाश तरी बघायला मिळेल, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. वाहनदरीचे ग्रामस्थ, विशेषत: महिला रात्रीच्या काळोखात पाणी भरत असताना त्यांना विद्युत प्रकाश नसल्याने अनेक अडचणींना त्रास द्यावा लागतो. रॉकेल मिळत नसल्याने या ठिकाणी दिवा लावणे बंद झाले आहे.महिलांना तसेच पुरुषांना काळोखातच पाण्यासाठी झिऱ्यावर जाऊन रात्र काढावी लागते. दरवर्षी उन्हाळा आला की झिऱ्याच्या ठिकाणी साचलेला गाळ काढावा लागतो. यंदाही झिऱ्याच्या परिसरातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. पाणी मिळावे म्हणून पाडय़ावरील सात-आठ लोकांनी आणि महिलांनी मिळून झिरा अधिक खोल खोदण्याचा प्रयत्न केला. त्यातून थोडेसे पाणी निघाल्याने त्यांना झिऱ्याच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.मुलाबाळांसह रात्रीची वणवणमहिला पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टाच्या व्यथा मांडत असताना अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या. मुलाबाळांना रात्री सोबतच घेऊन जावे लागते. जेव्हा झिऱ्यात पाणी साचेल तेव्हा पाणी भरून घरी यावे लागते. पाण्यासाठी जंगलातून जावे लागत असल्याने रात्रीच्या वेळी हिंस्र प्राण्यांची भीती असते. परंतु पाणी ही मूलभूत गरज असल्यामुळे धोका पत्करण्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. रात्री-बेरात्री या पाडय़ातील महिलांना आपली तहान भागवण्यासाठी झिऱ्याचा आसरा घ्यावा लागत असल्याचे मीनाबाई मिसाळ यांनी सांगितले.