नाशिक: केंद्र सरकारला सर्व काही करण्यासाठी वेळ आहे. परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचे त्यांना सुचत नाही. संसदेत आठ वर्षांत पन्नास वेळा सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी मागणी करण्यात आली. परंतु, केंद्र सरकार त्यांना भारतरत्न देत नाही. त्यास राज्य सरकार काय करणार, अशी नाराजी शिवसेनेचे खा.अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.

शनिवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूर येथील सावरकर स्मारकास भेट देत सावंत यांनी अभिवादन केले. यावेळी सावंत यांनी सावरकर यांना भारतरत्न दिल्यास देश मोठा होईल, असे सांगितले. सावरकर मोठेच देशभक्त आहे. सध्याच्या केंद्र सरकारला हिंदुत्व समजत नाही की ते पचत नाही आणि रुचत नाही अशी टीका सावंत यांनी केली. हिंदुत्ववादी देशभक्त सावरकर यांना भारतरत्न देण्याचे या सरकारला सुचत नाही, अशी खंत सावंत यांनी व्यक्त केली.