कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात घडली. संभाजी नानासाहेब सूर्यवंशी (वय ४८, रा. कळमदरी, नांदगाव) असे या शेतकऱ्याचे नाव असून शेतकरी आत्महत्येची तालुक्यातील ही आठवी घटना आहे. शेतात जाऊन येतो, असे सांगून संभाजी रविवारी दुपारी घराबाहेर पडले. ते घरी परत न आल्यामुळे त्यांना शोधण्यासाठी पत्नी शेतामध्ये आल्या. त्यावेळी पतीने विष प्राशन केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ संभाजी यांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सूर्यवंशी यांच्यावर बँकेचे आणि इतर असे अंदाजे सात लाख रुपये कर्ज असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बँकेकडून कर्जपुरवठा केला जात नसल्याने आणि शेतीमालास योग्य भाव मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तालुक्यातील ही आठवी घटना असून शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जावे आणि आर्थिक विवंचनेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर पावले उचलण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.