महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणारा व जिल्ह्य़ातील पेठ मार्गे जाणाऱ्या महामार्गापैकी नाशिक-पेठ दरम्यानच्या ३९.६० किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या मजबुतीकरण व रुंदीकरण कामास केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.
नाशिक-पेठ हा राष्ट्रीय महामार्ग एकूण ५४ किलोमीटरचा असून पहिल्या टप्प्यात १४.४० किलोमीटर लांबीचे मजबुतीकरण व रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. अनेक वर्षांपासून नाशिक-पेठ रस्ता बांधकाम विभागाकडे असल्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते.
२०१३ मध्ये हा रस्ता बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित झाला. रस्त्याची रुंदी कमी असल्याने तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या खड्डय़ांमुळे हा रस्ता धोकादायक झाला होता. रस्ता दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असताना कोणतीही अपेक्षित अशी कार्यवाही झाली नाही. हरिश्चंद्र चव्हाण आणि हेमंत गोडसे या दोन्ही खासदारांनी या रस्त्याबाबत वारंवार संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्याने अखेर रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. या महामार्गामुळे गुजरात व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांदरम्यान रस्ता वाहतूक वाढण्यास मदत होऊन त्यामुळे महसुलातही वाढ होणार आहे.
सर्व राष्ट्रीय महामार्ग काँक्रीटीकरणयुक्त व्हावेत, ही केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना असून या संकल्पनेनुसार जिल्ह्य़ात प्रथमच नाशिक-पेठ हा काँक्रीटीकरणयुक्त महामार्ग होणार आहे.
हा रस्ता सुमारे ५० वर्षांपर्यंत मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. या काँक्रीटीकरणामुळे दरवर्षी रस्ता देखभाल व दुरुस्तीवर होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. रस्त्यावरील धोकादायक वळणे तसेच घाटांची सुधारणा होणार असल्याने अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
दरम्यान, या रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे गुजरात व महाराष्ट्र दरम्यान दळणवळण वाढून महसुलातही वाढ होईल, अशी प्रतिक्रिया खा. हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली. केंद्रीय परिवहन मंत्रालयाप्रमाणेच राज्य शासनानेही रस्त्यासंदर्भात अशा प्रकारे धोरण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या रस्त्याच्या विकासामुळे रस्त्यालगत असणाऱ्या गावांच्या विकासाला चालना मिळेल, असे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी नमूद केले.