ग्रामीण भागातील अनेक शाळा मोडकळीस; संस्थाचालक, प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक : मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आता कु ठे सुरु झाल्या आहेत. इतके  दिवस शाळा बंद असतांनाही वेगवेगळ्या माध्यमांतून विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षांत बहुतांश शाळांकडून इमारत निधीही आकारला जात आहे. जिल्हय़ाच्या ग्रामीण भागातील काही शाळा या मोडकळीस आल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. या धोकादायक शाळा दुरुस्त करण्याची मागणी होत असताना संस्थाचालक, प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची पालकांची तक्रोर आहे.

जिल्ह्यतील बऱ्याच माध्यमिक शाळांचे बांधकाम हे ५० वर्षांपूर्वीचे आणि मातीचे असून त्यांची दुरवस्था झाली आहे. शाळेच्या या दुरवस्थेमुळे या इमारती धोकादायक बनल्या आहेत. शाळेचे छत गळू लागले आहे. शाळेतील भिंती जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यास पुरेशी बाके नाहीत. त्यामुळे जमिनीवर बसून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागते. कोंदट वातावरण, उखडलेल्या भिंती, तुटलेली दारे, गळके वर्ग, फुटक्या फरशा यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे शाळा स्तरावर संस्थाचालक शिक्षकांच्या पगारातून इमारत निधीच्या नावाखाली कपात करतात. यापूर्वीही शाळेच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी लाखोंचा निधी आणि वर्गणी जमा करूनही शाळेच्या स्थितीमध्ये थोडाही बदल होत नाही. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यामुळे या प्रश्नाकडे संबंधितांनी लक्ष देऊन शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांकडून के ली जात आहे.

सोमवारपासून जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील आठवी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरु झाल्याने शालेय इमारतींची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. सुमारे दीड वर्ष शाळा बंद असल्याने आणि आता पावसाळा सुरु झाल्याने वर्गात बसणे त्रासदायक होत आहे. वर्ग अनेक दिवसांपासून बंद राहिल्याने कु बट वास येत आहे. आदिवासी भागात तसेच डोंगरी भागात बऱ्याचशा शाळांभोवती झाडी आहेत. सध्या पावसाळा सुरु असल्याने अशा शाळांच्या इमारत परिसरात साप, विंचू वावरतात. विद्यार्थ्यांसाठी ते धोकादायक आहे. त्यामुळे शालेय परिसराची दररोज स्वच्छता करणे आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या सर्व गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे. विशेषत:? मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.