तपोवन, जनशताब्दी, नंदीग्राममधून मात्र प्रतिबंध मनमाड : मध्य रेल्वेने करोना काळानंतर प्रथमच अनारक्षित पॅसेंजर रेल्वे गाडय़ांमधून हंगामी तिकीटधारक (पासधारक) यांना प्रवास करण्यास एका विशेष आदेशान्वये परवानगी दिली आहे. मध्य रेल्वेच्या मनमाड -मुंबई पंचवटी एक्सप्रेससह सर्व डेमू पॅसेंजर गाडय़ांचा यात समावेश आहे. आता पंचवटीसह भुसावळ-इगतपुरी मेमू, पुणे पॅसेंजर, अजिंठा एक्स्प्रेस, धर्माबाद एक्स्प्रेस या गाडय़ांमधून प्रवास करण्यास पासधारकांना रेल्वेने परवानगी दिली आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील जिव्हाळय़ाच्या तपोवन, राज्यराणी, जनशताब्दी, नंदीग्राम या गाडय़ा आरक्षित असल्याने या गाडय़ांतून यापुढेही रेल्वे पासधारकांना प्रवास करण्यास बंदी राहणार आहे. या गाडय़ांतून किंवा इतर आरक्षित डब्यांमधून पासधारकांनी प्रवास केल्यास त्यांना विनातिकीट असे समजून त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. राज्य शासनाने आठ ऑक्टोबर २०२१ रोजी काही वर्गाना काही अटींवर पॅसेंजरमधून प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्यात पूर्ण लसीकरण झालेले तसेच सक्षम व अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असल्यासच हंगामी तिकीटद्वारे हा प्रवास करता येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या करोना संदर्भात सर्व अटी हा प्रवास करतांना बंधनकारक राहणार आहेत. तिकीट खिडकीवरून वितरीत केल्या जाणऱ्या हंगामी तिकिटांवर फक्त अनारक्षित पॅसेंजर गाडय़ांसाठी हे तिकीट आहे असा शिक्का राहणार आहे. तसेच ज्या मेल एक्स्प्रेस गाडय़ांना परवानगी असेल, त्या गाडय़ांचा उल्लेखही त्यावर स्पष्टपणे केला जाणार आहे. गोदावरी एक्स्प्रेस बंद होण्याची टांगती तलवार उत्तर महाराष्ट्रांतील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली मनमाड -लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस ही गाडी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची चर्चा होत आहे. मात्र रेल्वेचा अद्याप तसा कोणताही अधिकृत निर्णय झाला नसला तरी करोनानंतर ९५ टक्के रेल्वे गाडय़ा पूर्ववत झाल्या. गोदावरी मात्र झालेली नाही. त्यामुळे ही गाडी बंद होण्याची टांगती तलवार कायम असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.झिरो बेस्ड टाईम टेबल लागू करण्यात आल्यामुळे ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रतिसाद असलेल्या तोटय़ात धावणाऱ्या प्रवासी रेल्वे बंद करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत गोदावरी एक्स्प्रेस बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी रेल्वेने गोदावरीच्याच वेळेत असलेली जालना-मुंबई जनशताब्दी या प्रवासी गाडीचे डबे १५ वरून २२ केले आहेत. त्यावरूनच गोदावरी एक्सप्रेस बंद करण्याच्या हालचालींना दुजोरा मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रांतील लोकप्रतिनिधींनी याची तातडीने नोंद घेतली नाही तर उत्तर महाराष्ट्राची व नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेली गोदावरी एक्सप्रेस ही गाडी कायमस्वरूपी निसटण्याच्या बेतात आहे. मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस या गाडीला सहा अनारक्षित बोग्या जोडण्यात येत असल्याने ही गाडी अनारक्षित पॅसेंजर गाडी म्हणून राहील व हंगामी तिकीटधारकांना त्यातून प्रवास करता येणार आहे. मात्र राज्यराणी, जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, सेवाग्रामसह इतर मेल एक्सप्रेस गाडय़ा आरक्षित असल्याने या गाडय़ांमधून पासधारकांना प्रवास करण्यास मज्जाव आहे. - शिवाजी सुतार (मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई)