लोकसत्ता प्रतिनिधी जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्यानंतर काही दिवसांतच अपहरण करणारी टोळी ताब्यात घेण्यात आली असून पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात नंदुरबार येथील पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागातील हवालदाराचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. शहरातील पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी अप्पर अधीक्षक अशोक नखाते, सहायक निरीक्षक दांडगे उपस्थित होते. भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात २३ एप्रिलला मध्यरात्री दोन अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करुन झोक्यात झोपविलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण केले होते. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, अप्पर अधीक्षक नखाते, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांची पथके नियुक्त करण्यात आली. आणखी वाचा-नाशिक : इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक बबन जगताप, सहायक निरीक्षक विशाल पाटील, सहायक फौजदार विठ्ठल फुसे, हवालदार युनूस शेख, प्रेमचंद सपकाळे, वाल्मीक सोनवणे, दीपक जाधव, संजय भोई, संजय तायडे आदींच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने पाच दिवस शोध घेतला. संशयितांच्या ठिकाणाबाबत गोपनीय माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार भुसावळ येथील शिवपूर-कन्हाळे रस्त्यावरील नारायणनगर परिसरातील अलका जीवनस्पर्श फाउंडेशन येथे छापा टाकला. तेथे अपहरण झालेले आठ महिन्यांचे बाळ मिळून आले. पथकाने अधिक तपासात दीपक परदेशी (३२, रा. नारायणनगर, भुसावळ), अमित परिहार (३०, रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ), कुणाल वाघ (१९, रा. शिंगारबर्डी, साकेगाव, ता. भुसावळ), बाळू इंगळे (५१, रा. ऑर्डनन्स फॅक्टरी, सुशीलनगर, दर्यापूर शिवार, वरणगाव), रिना कदम (४८, रा. नारायणनगर, भुसावळ) यांच्या मुसक्या आवळल्या. त्यातील बाळू इंगळे हा नंदुरबार येथील जिल्हा पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात हवालदार म्हणून कार्यरत आहे. आणखी वाचा-मविआ नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर, जे. पी. गावितांविरोधात तक्रारीची शरद पवार गटाकडून तयारी संशयितांची कसून चौकशी केली असता, अजूनही एका संशयितासह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. अटकेतील संशयितांविरुद्ध यापूर्वी खून, खंडणी, जबरी चोरी, घरफोडी, मारामारी, चोरी यांसह विविध गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागातील इंगळे याच्यासंदर्भात नंदुरबार येथील पोलीस अधीक्षकांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे, असे अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले.