लोकसत्ता प्रतिनिधी नाशिक: सिन्नर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील पांडुरंग शिंदे (४२) हे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. काम करत असतांना तोल गेल्याने ते विहिरीत पडले. हा प्रकार अन्य लोकांच्या लक्षात येताच त्यांनी शिंदे यांना बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटनाही सिन्नर तालुक्यातीलच आहे. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मीठसागरे येथील ग्रामपंचायत सदस्य नंदा चतुर (३२) या त्यांच्या शेततळ्याजवळ गेल्या असताना पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. चतुर यांच्या पश्चात पती आणि दोन मुलगे असा परिवार आहे.