प्रशासनाचा सत्ताधारी; विरोधी पक्षांना ठेंगा नाशिक : महापालिकेच्या अखेरच्या सर्वसाधारण सभेत पालिका आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनाही आता महत्त्व नसल्याचे दाखवून दिले. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर आयुक्त वा तत्सम अधिकारी नसल्याने महापौरांना काही वेळ सभेतून बाहेर पडून प्रशासनाला धारेवर धरावे लागले. तेव्हा मोठय़ा मुश्किलीने अतिरिक्त आयुक्त दाखल झाले. प्रशासनाच्या असहकार्याच्या भूमिकेवरून महापौरांसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी रोष प्रगट केला. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रशासनाच्या बदललेल्या कार्यपध्दतीचे दर्शन घडले. १५ मार्चपासून मनपात प्रशासक राजवट सुरू होत आहे. त्याचा अनुभव सभेतच मावळत्या महापौरांसह नगरसेवकांनाही घ्यावा लागला. कार्यकाळ संपत असल्याने महापौरांना ही सभा प्रत्यक्ष मनपा सभागृहात घ्यायची होती. तथापि, करोनाच्या नियमांवर बोट ठेवत प्रशासनाने परवानगी नाकारली. आभासी सभेत सभागृहातील पिठासन वापरता आले नाही. अखेरच्या सभेत नगरसेवकांसाठी स्नेहभोजन ठेवण्याचा महापौरांचा इरादा होता. परंतु, प्रशासनाने त्यालाही परवानगी दिली नसल्याची चर्चा आहे. गुरूवारच्या सभेची माहिती पालिका आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांना होती. परंतु, अनेकांनी त्यात सहभागी होण्यात स्वारस्य दाखविले नाही. सभा सुरू होऊनही अधिकारी सहभागी झाले नाहीत. त्यामुळे आज प्रशासनाची प्रतीक्षा करण्याची वेळ नगरसेवकांवर आल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सुनावले. अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगी घेतली का, असा प्रश्न काहींनी उपस्थित करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. नगरसचिवांनी सर्वसाधारण सभेची माहिती, विषयपत्रिका सर्वाना दिली गेली असून काही अधिकारी सहभागी झाल्याचे नमूद केले. प्रशासकीय अधिकारी सहभागी होईपर्यंत सभेचे कामकाज होणार नसल्याचा पवित्रा घेत महापौर काही वेळ बाहेर पडले. त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावल्याचे सांगितले जाते. त्यानंतर काही वेळात अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे आले. वेगवेगळय़ा मुद्यांवरील चर्चेत अधिकारी गांभीर्याने उत्तरे देत नव्हते. मंगळवारपासून महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होत आहे. तत्पूर्वी, महापौरांसह नगरसेवकांना तिची झलक अनुभवयास मिळाली. आजवर ज्यांच्या मागे-पुढे अधिकाऱ्यांचा लवाजमा दिसायचा, त्या महापौरांनाही प्रशासनाच्या असहकार्यावर नाराजी व्यक्त व्यक्त करण्याची वेळ आली. पुन्हा निवडणूक लढविणार नाही महापौरपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने आयटी पार्क, लॉजिस्टिक हब, बीओटी तत्त्वावर भूखंड विकास आदी त्त्त्वाच्या प्रकल्पांना चालना दिली. अशा प्रकल्पातून मनपाच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. सर्वाना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. कुणालाही दुखावले नाही. महापालिकेत आजवर अनेक पदे भूषवली असून पुढील काळात निवडणूक लढविणार नसल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्नोकरभरतीसाठी शासनाकडे बराच पाठपुरावा केला. किमान मानधन तत्त्वावर भरती व्हावी, यासाठी प्रयत्न केले. पण त्यास अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.