नाशिक : मुंबई येथील प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार २८ सप्टेंबर रोजी नाशिकसह जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या काळात खबरदारी बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे.

हवामान विज्ञान केंद्राने २८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. तसेच सर्व पूरप्रवण क्षेत्रातील गावांनी, नदी-नालेकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदी व धरण पात्रात कोणी उतरू नये, आपले पशुधन, वाहने सुरक्षित स्थळी ठेवावीत. पूरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही डोईफोडे यांनी केले.