नवी मुंबई : अनैतिक संबंधात भाऊ अडसर ठरत असल्याने प्रियकराला सांगून त्यांना मारहाण केली. याचा राग धरून तिच्या भावांनी बहिणीच्या प्रियकराची हत्या केली. ही घटना कामोठे येथे ४ जून रोजी घडली होती. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केले आहे.

रोशनलाल साहू, संदीप साहू, सोनू कुशवाह, महाराजा साहू अशी अटक आरोपींची नावे आहेत. लक्ष्मीकांत मिश्रा असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

आरोपी रोशन आणि संदीप यांच्या बहिणीचे लक्ष्मीकांत मिश्रा याच्याशी प्रेमसंबंध होते. यातून त्यांच्यात वाद सुरू होते. विरोध करणाऱ्या दोन्ही भावांना भीती घालण्यासाठी प्रियकरालाच भावांना मारहाण करण्याचा सल्ला तिने दिला होता. त्यातून प्रियकराने मित्रांच्या मदतीने ३ जून रोजी तिच्या भावांना मारहाण केली होती. याचा राग त्यांच्या मनात होता. मात्र त्यांनी बहिणीच्या प्रियकराशी संपर्क करीत झाले गेले विसरून जाऊ, असा विश्वास देत बोलणे करण्यासाठी त्याला भेटायला बोलावले. तो आल्यानंतर त्याच्यावर हल्ला करत बेदम मारहाण केली. आरोपी संदीप साहू याने धारदार शस्त्राने त्याच्या पोटात वार केले. त्यात मिश्रा याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी मयत मिश्रा याचा मृतदेह वैद्यकीय तापसणीसाठी ताब्यात घेत चारही आरोपींना जुहू गावातून अटक केली आहे.