वन विभागाला यश नवी मुंबई : बेलापूर येथील पालिका मुख्यालयाच्या मागील तलावात असलेल्या मगरीला पकडण्यात मंगळवारी पहाटे वन विभागाला यश आले आहे. गेले आठ दिवस वन विभागाची आठ पथके मगरीचा शोध घेत होती. त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निङ्मश्वास सोडला आहे. ऑगस्ट महिन्यात स्थानिक ग्रामस्थांना बेलापूर तलावात मगर आढळली होती. याबाबत त्यांनी तक्रार केली होती. मात्र वन विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर १५ व १७ फेब्रुवारी रोजी या मगरीने पुन्हा एकदा दर्शन दिले. त्यामुळे मच्छीमार व स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यानंतर वन विभागाने या मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी ठाणे वन विभागाला पाचारण करण्यात आले होते. मात्र ही मगर दलदलीचा भराव असलेल्या तलावात तसेच मुख्य महामार्गालगत असल्याने तिला पकडणे मोठे आव्हान होते. यासाठी आठ पथके करण्यात आली होती. त्या ठिकाणचा परिसर जाळीने बंदिस्त करून पिंजरा लावण्यात आला होता व त्यावर लक्ष ठेवले जात होते. अखेर आठ दिवसांनंतर मंगळवारी पहाटे मगर जाळ्यात अडकली अशी माहिती ठाणे वन विभाग अधिकारी यांनी दिली आहे. या तलावात जास्त दलदल असल्याने मगरीला पकडणे अवघड होते. त्यामुळे या ठिकाणी वन अधिकारी यांच्या निगराणीत पिंजरा लावण्यात आला. मंगळवारी या पिंजऱ्यात ही मगर सापडली असून तिला आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ठेवून तिला तिच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे. -नरेंद्र मुठे, क्षेत्रीय वन अधिकारी, ठाणे