नवी मुंबईतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खोदकामे सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावर गोठिवली, घणसोली या परिसरांत रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम तर अंतर्गत रस्त्यांवर मलनिस्सारण वाहिन्या, महानगर गॅसची पाइपलाइन, जलवाहिनी, भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे व एमआयडीसीमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम आदी विकासकामे सुरू असल्यामुळे रस्ते खोदून ठेवण्यात आले असून ही खोदकामे डोकेदुखी ठरली आहे.
रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे अर्धा रस्ता हा वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला असताना एका बाजूने जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ता खुला ठेवण्यात येत नाही, तर तो दोन्ही बाजूंच्या वाहनांसाठी खुला ठेवण्यात येतो. त्यामुळे समोरासमोर दोन्ही वाहने आल्याने रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी होते. तसेच वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकीदेखील होत आहेत. ऐरोली, सेक्टर ५ ते सेक्टर ४ परिसरामध्ये वाहिन्या टाकण्यासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तसेच ऐरोली, सेक्टर ३ येथील उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करण्यात आल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. रबाळे, महापे येथील औद्योगिक पट्टय़ांमध्ये रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून वाहतूक कोंडी होत आहे. मंदगतीने सुरू असलेल्या कामांमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना रोजच्या मार्गामध्ये बदल करावा लागत आहे. ज्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी पुढे रस्ता बंद आहे असा फलकही लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ज्या ठिकाणच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तेथे रेती, वाळू तशीच पडून राहिल्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
महानगरपालिका, महावितरण, महानगर गॅस, रिलायन्स, इंटरनेटसाठी यांसारख्या कंपन्यांच्या वाहिन्या टाकण्याच्या कामांमध्ये पुरेसा समन्वय नसल्यामुळे रस्ते वारंवार खोदले जात आहेत. भूमिगत विद्युत वाहिन्या टाकलेल्या असताना एखाद्या वेळी विद्युतपुरवठा खंडित झाला तर ज्या ठिकाणी नादुरुस्त झाली आहे ते शोधण्यासाठी रस्ता खोदण्यात येतो. रस्ते खोदल्यानंतर ते व्यवस्थित बुजविण्यात येत नसल्यामुळे रस्त्यांना खड्डे तसेच राहतात. रस्त्यांची कामे सुरू असताना पदपथावर संबंधित कामाचे बांधकाम साहित्य टाकण्यात येते, त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.