स्वच्छता विषयक जनजागृती व्यापक स्वरूपात होण्यासाठी पालिकेच्या वतीने स्वच्छता पंधरावडा मोहीम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवात अधिक नागरिक एकत्र येत असतात याचे औचित्य साधून अनेक सार्वजनिक गणेशउत्सव मंडळात स्वच्छता पथनाटय़ सादर करण्यात आली. यावेळी नागरिकांचे मनोरंजन करीत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. ‘सप्तर्षी कला मंच’च्या माध्यमातून ‘स्वच्छता हीच सेवा’ हा संदेश पोहचवून नागरिकांनी आपल्या घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता घरातच ओला व सुका असा वेगवेगळा ठेवावा पालिकेच्या कचरागाडय़ांमध्ये देतानाही वेगवेगळा द्यावा, असे नाटय़ संहितेतून पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे उघडय़ावर शौचास न जाता शौचालयाचा वापर करण्याचे आणि प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगुन प्लास्टिक पिशवी न वापरण्याचे आवाहन करण्यात आले. ‘उदासीनता घालवावी लागेल’ पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताना स्वच्छतेच्या महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे बहुतेकदा दुर्लक्ष केले जाते. उत्साहाच्या भरात बहुधा असे होत असावे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नागरिकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत असलेली उदासीनता. या उदासीनतेवरच या पथनाटय़ांमधील संहितेतून बोट ठेवण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.