दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिवस नवी मुंबई महानगरपालिकेत पाळण्यात आला. पालिका मुख्यालयातील अॅम्पी थिएटरमध्ये अधिकारी-कर्मचारी यांनी एकत्र येऊन दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त सामूहिक प्रतिज्ञा केली. याद्वारे भारताचे नागरिक म्हणून देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकविण्याची आणि वर्धिष्णू करण्याची तसेच मानवी मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची शपथ ग्रहण करण्यात आली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सर्व शासकीय कार्यालये व इमारतीमध्ये १६ ते ३१ मे या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने या वेळी स्वच्छतेची सामूहिक शपथही ग्रहण करण्यात आली. पालिकेच्या सर्व कार्यालयांत ही विशेष स्वच्छता मोहीम राबवून कार्यालय परिसर व अधिकारी-कर्मचारी बसत असलेला परिसर स्वच्छ करणे, स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवणे अशा प्रकारे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, अतिरिक्त आयुक्त शहर अंकुश चव्हाण, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.