नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची विदारक स्थिती; रेल्वेची वाट पाहताना प्रवाशांना छत्रीचा आधार

पावसामुळे शहरातील लोकसेवा प्रभावित झाली असताना हार्बर मार्गावरील फलाटांवरील गळक्या छतांमुळे  नवी मुंबईतील हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात वारंवार तक्रारींचा पाढादेखील प्रशासनापुढे वाचला जात आहे, पण त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे या समस्या जैसे थेच आहेत.

हार्बर मार्गावर रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. या मार्गावरील रेल्वे या जुन्या असल्यामुळे निकामी खिडक्या, नादुरुस्त दरवाजे, मोडकी आसन व्यवस्था यांचा सामना प्रवासादरम्यान करावा लागत आहे. मात्र या मार्गावरील स्थानकांच्या छतांमधून होणारी पाण्याच्या गळतीमुळेदेखील प्रवाशांना स्थानकांवर उभे राहणेदेखील कठीण झाले आहे. सीबीडी, जुईनगर, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, ऐरोली या रेल्वे स्थानकांमध्ये लोकलची वाट पाहत उभ्या असणारे प्रवासी गळक्या छतांमुळे त्रस्त आहेत. तर या पाण्यामुळे फलांटावर घसरून  पडल्यामुळे  अपघाताची शक्यता आहे.  त्यामुळे बहुतांश फलाटांवर छत्री घेऊनच प्रवाशांना रेल्वेची वाट पाहावी लागत आहे.

हार्बरवरील बहुतांश रेल्वे स्थानकांच्या फलाटांवरील छतांमधून पावसाच्या पाण्याची गळती होते. त्यामुळे फलाटावर छत्री घेऊनच रेल्वेची वाट पाहावी लागते. कोपरखैरणे स्थानकात बसण्यासाठी असलेल्या बाकांवर पण पाणी पडत असल्याने बसण्यासाठी पण जागा उपलब्ध नाही.    – शारदा भोर, प्रवासी