पनवेल : मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचून रस्त्यांवरही सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नवीन पनवेल वसाहतीमधील बांठिया हायस्कूलसमोरील मार्ग पाण्याखाली गेला होता. तर शहरातील पंचरत्न हॉटेल ते भाजप कार्यालयापर्यंतचा रस्ता, शीव-पनवेल महामार्गावर अमरधाम तसेच कळंबोली येथील बसथांब्यावर एक ते दीड फूट पाणी तुंबले होते. पनवेल महापालिकेने पावसाळापूर्व कामे उशिरा हाती घेतली तरी सर्व ठिकाणची स्वच्छता झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी गटारांमध्ये कचरा अडकल्याने पावसाळी पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. कळंबोलीतील केएलवन, एलआयजी, केएल २, केएल ४ व केएल ५ अशा सर्व सिडको सोसायटय़ांमध्ये तळमजल्यावरील नागरिकांना पाणी तुंबण्याचा त्रास सहन करावा लागला. पाणी निचरा करण्यासाठी महापालिकेचे पथक शहरात कार्यरत होते. मात्र सिडको वसाहतींमधील मुख्य नाल्यांची सफाई न झाल्याने आणि पावसाळी नाल्यातील गाळ न काढल्याने गटारे व नाले तुडुंब होत हे पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे पादचऱ्यांसह वाहनचालकांची गैरसोय होत होती. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेलमध्ये सखल भागात पाणी साचले तर रस्त्यांवरही सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शीव-पनवेल महामार्गावर अमरधाम तसेच कळंबोली येथील बसथांब्यावर एक ते दीड फूट पाणी साचले होते. उरणमध्ये दोन दिवस ११६ मिलिमीटर पाऊस झाल्याने रानसई धरणाची पाणीपातळी वाढून पुढील काही दिवस उरणकरांची पाणी टंचाई दूर होणार आहे.