वैद्यक क्षेत्र, पोशाख पद्धती (फॅशन), क्रीडा या शाखांमध्ये चाणाक्ष वस्त्रप्रावरणांच्या तंत्रज्ञानाबद्दल व त्यांच्या विकासाच्या प्रक्रिया आत्मसात करण्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे, परंतु चाणाक्ष वस्त्रप्रावरणांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या स्वीकारण्यामध्ये अनेक आव्हाने आहेत. चाणाक्ष वस्त्रप्रावरणांच्या निर्माणक्षमतेमध्ये अनेक तंत्रज्ञानांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जसे वस्त्र तंत्रज्ञान, सेमिकंडक्टर पदार्थविज्ञान, नॅनोतंत्रज्ञान, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र, अनॅलॉग व डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, वायरलेस कम्युनिकेशन, पर्यावरण.
चाणाक्ष वस्त्रप्रावरणांपुढील आव्हाने : चाणाक्ष वस्त्रप्रावरणाच्या निर्माण प्रक्रियेत अनेक तंत्रज्ञानांचा सक्रिय सहभाग असल्याने त्याच्या निर्माण प्रकल्पात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे या तंत्रज्ञानाचा चाणाक्ष वस्त्रप्रावरणांच्या निर्मितीसाठी यशस्वी समन्वय. विशिष्ट शाखेचे निष्णात अभियांत्रिकी तज्ज्ञ उपलब्ध आहेत. उदा : काही संस्था इलेक्ट्रॉनिक्स, तर दुसऱ्या संस्था वस्त्रतंत्रज्ञान तर काही पर्यावरण. तसेच फ्लेक्सिबल इलेक्ट्रॉनिक्समध्ये उपलब्ध असलेले निष्णात तज्ज्ञ फक्त शाळा-महाविद्यालयं, विद्यापीठं इथेच आढळतात. त्यांना व्यावहारिक अनुभव नसतो. त्यामुळे उपलब्ध ज्ञान इच्छित उपयुक्तेसाठी संक्रमित करणे हे फार मोठे दुसरे आव्हान आहे.
उपलब्ध असलेले निष्णात तज्ज्ञ व व्यापार/ व्यवसायतज्ज्ञ यांचा इच्छित उद्दिष्ट साधण्यासाठी सहकार्य हे तिसरे आव्हान.
चाणाक्ष वस्त्रप्रावरणामध्ये दडलेल्या सुप्त संभावना लक्षात घेतल्यास चाणाक्ष वस्त्रप्रावरणामध्ये चलत अंकित क्षेत्र क्रांतिकारकरीत्या बदलेल याची खात्री पटेल. वरील विविध तंत्रज्ञानाचा निष्णात अनुभव व समन्वय चाणाक्ष वस्त्रप्रावरणांच्या अगाध क्षमतेविषयी खात्री देईल. तुमची पॅण्ट या ऊर्जा संक्रमित करणाऱ्यांत बॅटरी होऊ शकतात म्हणून विविध भ्रमण उपकरणे पुनरुज्जीवित (बॅटरी चाìजग) करतील, तुमची हॅट सेल्युलर भ्रमणध्वनीचा अ‍ॅण्टेना संवर्धन करणारं उपकरण, अंगरखा/ सदऱ्याच्या बाह्या, माहिती साठा करणारे कोठीघर, तुमचे पाय/हातमोजे तुमच्या भ्रमणध्वनीचे नियंत्रणकक्ष बनतील, हॉटेलमधील टेबलावरील रुमाल उपलब्ध पदार्थाची यादी दाखवील, रुग्णालयातील चादरी रुग्णाचे अंगभूत वस्त्र असल्याने रुग्णाची सर्व वैद्यकीय परिमाणं नियंत्रित करून स्मृतीत ठेवील. चाणाक्ष वस्त्रांचा या व्यावहारिक यशाचा ‘नासा’च्या अवकाशयान झेपेमध्ये महत्त्वाचा वाटा आहे याची नोंद घेणे जरुरीचे आहे.
– श्वेतकेतू (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

तंजावरचे राज्य
सध्या तामीळनाडूतील जिल्ह्याचे ठिकाण तंजावर हे सतराव्या अठराव्या शतकात भोसले घराण्याच्या राज्याचे मुख्यालय होते. इ.स. मध्ये चोळांनी स्थापन केलेले तंजावर राज्य पुढे पांडय़, दिल्ली सुलतान, विजयनगर, मदुराई नायक आणि तंजावर नायक यांच्या अंमलाखाली आले. तंजावर नायक राजा विजयराघव याचा खून झाल्यावर त्याच्या मुलाने आपले राज्य परत मिळविण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहकडे मदत मागितली. त्या काळात शहाजी राजे भोसले यांचा मुलगा व्यंकोजी उर्फ एकोजी आदिलशाहकडे नोकरीस होता. आदिलशाहने व्यंकोजीला सन्य देऊन तंजावर नायकाला राज्य परत घेण्यास मदत करण्यासाठी पाठविले. परंतु व्यंकोजीने तंजावर येथे जाऊन तंजावर आपल्याच ताब्यात घेऊन स्वतंत्र सत्ता स्थापन केली.
व्यंकोजी उर्फ एकोजीची राजकीय कारकीर्द इ.स. १६७४ ते १६८४ अशी झाली. व्यंकोजी हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. व्यंकोजी नंतर तंजावर गादीवर शाहुजी प्रथम, सरफोजी प्रथम, तुकोजी, प्रतापसिंह आणि तुळाजी यांची कारकीर्द झाली.

तुळाजीच्या कारकीर्दीत कर्नाटकच्या नवाबाने तंजावरवर आक्रमण करून कबजा केला. त्यावर तुळाजीने ईस्ट इंडीया कंपनीची मदत घेऊन नवाबाकडून आपले राज्य परत मिळवले. पुढे गादीवर आलेल्या सरफोजी द्वितीयने ब्रिटीशांची मदत घेऊन आपल्या चुलत्यापासून संरक्षण मिळविले.
ब्रिटिशांनी १७९९ साली तंजावर संस्थान खालसा करून मद्रास प्रेसिडेन्सीत सामील करून घेतले. १७९९ ते १८३२ या काळात तो केवळ नामधारी राजा बनून राहिला.
आजही सरफोजी द्वितीय ओळखले जातात, ते त्यांच्या साहित्यीक अभिरुचिबद्दल आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘सरस्वती महाल’ ग्रंथ संग्रहालयामुळे. ही ‘पब्लिक लायब्ररी’ असून आजही तेथे ६० हजारांहून अधिक पुस्तके आहेत. यापैकी अनेक पुस्तके व हस्तलिखिते दुर्मीळ आहेत.

 – सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com