‘अवघी भूतें साम्या आलीं।’ या काल दिलेल्या अभंगात तुकाराम महाराजांनी दोन मुद्दे मांडले आहेत. १. सर्व भूतांचे ठायी साम्य दिसू लागणे हाच ईश्वर दर्शनाचा अर्थ समजावयाचा. गीताही असेच म्हणते - इहैव तैर्जित: सर्गो येषां साम्ये स्थितं मन:। निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिता:।। भावार्थ - ज्याचे मन साम्यात स्थिर आहे ते ब्रह्मात स्थिर आहेत. कारण निर्दोष साम्य हेच ब्रह्माचे स्वरूप आहे. २. सर्व भूतांचे ठायी मला संपूर्ण साम्य दिसू लागले असे मी विश्वासपूर्वक तेव्हाच म्हणावे जेव्हा सर्व भूते माझ्याविषयी नि:शंक किंवा निर्भय बनतील. हाच भाव गीतेच्या भक्त लक्षणात सांगितला आहे. ‘यस्मान्नोद्विजते लोके लोकान्नो द्विजते च य:।’ एकदा तुकाराम महाराज ज्ञानोबांच्या दर्शनासाठी आळंदीला जात असता वाटेत एका झाडाखाली पक्षी दाणे टिपीत होते. ते त्यांना पाहून उडाले. पक्षी उडालेले पाहून महाराजांना फार खेद वाटला. त्या वेळी त्यांच्या तोंडातून निघालेला हा अभंग आहे. पुढे महाराज त्या ठिकाणी जराही न हलता, श्वासोच्छवास स्थिर करून, अंत:करणात सर्वातर्यामी परमेश्वराचे स्मरण करीत चार घटका एखाद्या खांबासारखे उभे राहिले. पक्षी माझ्याविषयी निर्भय झाल्याशिवाय मी येथून हलणार नाही हा त्यांचा निश्चय होता. शेवटी चार घटका एखाद्या खांबासारखे उभे राहिल्यावर पक्षी महाराजांचा प्रेममय विश्वात्मभाव ओळखून त्यांच्या खांद्यावर बसले आणि एखाद्या झाडावर बसून खेळतात तसे खेळू लागले. पुढे महाराजही भजनाच्या भरात डोलतात तसे डोलू लागले तरी ते पक्षी उडून गेले नाहीत. तेव्हा महाराजांचे समाधान होऊन ते हलले. (सं. संतांचा प्रसाद). विनोबांनी वर गीतेतील ‘भक्त-लक्षणां’चा उल्लेख केला आहे. साम्ययोगाचा विचार करताना ती लक्षणे अत्यंत महत्त्वाची आहेत. गीतेत वर्णन केलेला भक्त कसा आहे? तो कुणाचा द्वेष करत नाही. मी, माझे या भावनांना तो थारा देत नाही. वाटय़ाला येणारी सुख-दु:खे तो क्षमाशीलतेच्या जोरावर सहन करतो. तो सदा संतुष्ट आणि योगी असतो. त्याने आपली बुद्धी आणि मन मला (भगवंताला) अर्पण केलेले असते. तो लोकांना कंटाळत नाही आणि लोकही त्याला. असा योगी हर्ष, शोक, भय, क्रोध या भावना जाणत नाही. दु:ख आणि व्यथा या गोष्टी त्याच्या गावीही नसतात. ही लक्षणे आदर्श सत्याग्रहीचीही आहेत. सत्य, अिहसा, सर्वाशी मैत्री आणि कुणाचाही द्वेष करायचा नाही. भक्ताच्या कसोटीला उतरणारी व्यक्ती किती मोठी वाटचाल करते हेही यानिमित्ताने समजते. गीतेचा बारावा अध्याय छोटा असला तरी या भक्त-लक्षणांमुळे अत्यंत गोड आणि सखोल आहे. ज्ञानी, योगी आणि भक्त या त्रिसूत्रीमधील ऐक्य तिथे आढळते. वेद, उपनिषदे, गीता, आचार्य शंकर, ज्ञानदेव महत्त्वाचे संत, या वाङ्मयाच्या सखोल अध्ययनातून विनोबा साम्ययोगाच्या भूमिकेवर आले की वास्तव काही वेगळे होते? त्यांची साम्ययोगाची तयारी आणखीही कुणी करून घेतली? - अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com