ज्या ठिकाणी साडय़ांची निर्मिती झाली त्या ठिकाणच्या नावाने त्या साडय़ा ओळखल्या जाऊ लागल्या. पठणची पठणी, महेश्वरची महेश्वरी इत्यादी अनेक उदाहरणे देता येतील. ही परंपरा अजूनही सुरू आहे आणि त्या सर्व साडय़ा आपापली वैशिष्ये कायम ठेवून बाजारात आपले स्थान टिकवून आहेत. पण याला एक अपवाद आहे ती अहमदनगरला तयार होणारी, पण गुंडू या आडनावाने ओळखली जाणारी साडी.

आंध्र प्रदेशातील पद्मशाली समाजाने ठिकठिकाणी स्थलांतर केले. त्यातील काही कुटुंबे अहमदनगरला स्थायिक झाली. वस्त्रोद्योग हा त्यांचा पारंपरिक पोटापाण्याचा उद्योग, त्यातदेखील सुती साडय़ा हे त्यांचे खास वैशिष्टय़ रोजच्या रोज साडय़ा विणून संध्याकाळी व्यापाऱ्याकडे जायचे, साडय़ा विकायच्या. परत दुसऱ्या दिवशी पुन्हा साडय़ा विणायच्या. जसा मानवनिर्मित तंतूचा वापर वस्त्रोद्योगात वाढला तशी सुती साडय़ांची मागणी कमी झाली. मग अनेकांनी हा धंदा सोडून उपजीविकेसाठी इतर कामकाज करायला सुरुवात केली. मात्र गुंडू कुटुंबीयांनी आपले काम सचोटीने सुरूच ठेवले. चांगले तलम सूत, त्यात कुठेही भेसळ नाही, आकर्षक रंगसंगती आणि उच्च दर्जाची गुणवत्ता राखत हातमागावर साडय़ा विणत राहिले. सुती साडय़ा आणि त्यांचा चांगला दर्जा यामुळे अहमदनगरमध्ये गुंडू साडीने आपले स्थान निर्माण केले. मग हळूहळू बाहेरगावीही गुंडू साडय़ांना मागणी येऊ लागली. पूर्वी मोठय़ा काठाच्या साडय़ा तयार केल्या जायच्या, आता लहान काठाच्या साडय़ा तयार केल्या जातात. आणि यामुळेच गुंडू साडय़ांची बाजारपेठ टिकून राहिली.
स्थानिकरीत्या या साडीची मागणी टिकवून ठेवण्यासाठी या कुटुंबाने अनेक युक्त्या वापरल्या. तसेच काठातील बदलाप्रमाणे नऊवारी, सहावारी, पाचवारी, ब्लाऊजपीससहित असे पर्यायही ग्राहकांना उपलब्ध करून दिले. हे सर्व करताना गुणवत्ता कायम राखली. तसेच वेळोवेळी मागणीनुरूप बदल केले, काठ पदराचे कॉन्ट्रास्ट मॅचिंग हा त्यातलाच एक प्रकार. या साडीत जरीचा वापर नसतो, त्यामुळे साडीची किंमत कमी राहते. पण जरीऐवजी पिवळ्या चमकदार धाग्याचा वापर करून ही जागा भरून काढली जाते. जर नसल्यामुळे काठ काळे पडण्याचा त्रास होत नाही.

 दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 
जयसिंह बहादूरचा कारभार

कुशवाह राजपूतांनी स्थापन केलेले अलवार राज्य दिल्लीहून केवळ १५० कि.मी. दक्षिणेला असल्याने दिल्लीतील राजकीय घडामोडींचे पडसाद अलवारमध्ये त्वरित उमटत असत. राजा भक्तावरसिंहने १८०३ मध्ये कंपनी सरकारची तनाती फौज राखून त्यांचे संरक्षण घेतले होते. १८५७ साली शिपायांच्या बंडाने सुरुवात झालेल्या स्वातंत्र्य समरात अलवार रावराजा बनेसिंह याने आग्रा किल्ल्यातील ब्रिटिश शिबंदीची सुटका करण्यासाठी अलवारचे सन्य पाठविले. पण बंडखोरांनीच या अलवार फौजेचा बीमोड केला.
जयसिंह बहादूर या अत्यंत क्रूर, विक्षिप्त, लहरी राजाची कारकीर्द इ.स. १८९२ ते १९३७ अशी झाली. प्रजेवर जुलूम करणे हा तो स्वत:चा अधिकार समजत असे. स्वत:ला सूर्याचा वंशज म्हणवून घेणारा जयसिंह प्रभू रामचंद्रांप्रमाणे खडावा वापरीत असे. पाश्चात्त्यांना अस्पृश्य समजणारा हा राजा त्यांच्याशी हस्तांदोलन करताना हातमोजे वापरीत असे. एकदा बादशाह जॉर्ज पाचवे यांच्याशी हस्तांदोलन करताना जयसिंहाने हातमोजे घातल्याने बादशहाचा संताप अनावर झाला होता. चार विवाह करणाऱ्या जयसिंहला स्त्रियांपेक्षा पुरुषांचा सहवास अधिक प्रिय होता. राज्यकारभाराकडे पूर्ण दुर्लक्ष असलेल्या या राजाचा विक्षिप्तपणा वाढू लागला व अखेरीस ब्रिटिश व्हाइसरॉयने जयसिंहाला पदच्युत करून त्याला अलवार संस्थानात राहण्यास बंदी घातली. त्यानंतर राजा जयसिंह फ्रान्समध्ये स्थायिक झाला व तिकडेच त्याचा मृत्यू झाला. इकडे अलवारच्या गादीवर जयसिंहचा लांबचा नातेवाईक तेजसिंह प्रभाकर याला ब्रिटिशांनी १९३७ साली बसविले. तेजसिंह ब्रिटिशांशी प्रामाणिक, निष्ठावंत राहिला परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी त्याचे वैर होते. महात्मा गांधी यांच्या हत्येत राजा तेजसिंहचा हात असल्याचे उघडकीस आल्यावर पुढे त्याला अटक आणि शिक्षा झाली. पुढे त्याचे सर्व खिताब, पदके रद्द करून खजिना जप्त करण्यात आला.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com