हिरव्या वनस्पती आपले अन्न हवेतील कार्बन डायॉक्साइड वापरून निर्माण करतात. कार्बन डायॉक्साइडचे हवेतले प्रमाण सुमारे ०.०३९ टक्के इतके कमी असते. ते जर वाढवता आले तर आपल्याला शेतीतून अधिक उत्पन्न मिळू शकते. रात्रीच्या वेळी वनस्पती श्वसनाद्वारे कार्बन डायॉक्साइड बाहेर टाकतात. हा वायू हवेच्या दीडपट जड असल्याने वारा नसेल तर तो जमिनीजवळ साठून राहतो. त्यामुळे दाट अरण्यात रात्री जमिनीलगतच्या वातावरणात कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण ०.१२ टक्के इतके, म्हणजे उघडय़ावरील वातावरणाच्या तिप्पट इतके असू शकते. शेतातल्या पिकांमधूनसुद्धा रात्री कार्बन डायॉक्साइड बाहेर पडतो, पण तो शेतात साठून राहात नाही. पिकातील वनस्पतींसभोवतीच्या वातावरणातील कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण जर वाढवावयाचे असेल तर हरितगृहासारख्या प्रणालीचा वापर करणे इष्ट ठरते. हरितगृह ही कल्पना मूळची युरोपातल्या थंड प्रदेशातली. तिथे हिवाळ्यात ताज्या भाज्या आणि नाताळ किंवा ईस्टरसाठी लागणारी फुले मिळविण्यासाठी प्लॅस्टिकच्या पारदर्शक पडद्यांनी मढविलेल्या कक्षांमध्ये कृत्रिमरीत्या तापमान वाढवून त्यात भाज्या आणि फुले वाढविली जातात. या कक्षांमधली उष्णता बाहेर जाऊ नये यासाठी ते बंदिस्त असणे आवश्यक असते. पण या प्रणालीचा मूळ उद्देश लक्षात न घेता युरोपात बांधतात तशीच हरितगृहे आपण भारतात बांधली. या प्रकारच्या हरितगृहांची किंमत प्रति हेक्टर सुमारे रु. दोन कोटी असते. त्याचे व्याज आणि घसारा यांचाच खर्च होतो प्रति वर्षी रु. ४० लाख. म्हणजे हरितगृहात शेती करावयाची असेल तर दर वर्षी प्रति हेक्टर रु. ५० ते ६० लाखांचे उत्पन्न त्यातून मिळावयास हवे. शेतमालाच्या आजच्या भावात तरी हे शक्य नाही. त्यामुळे पाश्चात्य पद्धतीचे बंदिस्त हरितगृह न बांधता बांबूचे डांभ उभे करून त्यांच्या आधाराने प्लॅस्टिकच्या कनाती उभारून शेताचे १० मीटर बाय १० मीटर असे भाग पाडावेत. थोडक्यात म्हणजे कार्बन डायॉक्साइड साठविणाऱ्या टाक्या निर्माण कराव्यात. या टाक्यांमुळे रात्री निर्माण होणारा कार्बन डायॉक्साइड वनस्पतींच्या भोवतीच्या वातावरणातच साठवला जातो आणि सूर्योदयानंतर तो प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. अशी व्यवस्था केल्यास आपल्याला कितीतरी कमी खर्चात नेहमीच्या दुप्पट उत्पन्न मिळवता येते.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई २२  office@mavipamumbai.org
(बुधवार, ३ जानेवारीच्या ‘कुतूहल’चे लेखकही डॉ. आनंद कर्वे आहेत. हा उल्लेख अनवधानाने राहून गेला )

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी..      
४. ठिसूळ हाडे
तुम्ही कितीही उच्चविद्याविभूषित असलात आणि कितीही मोठे एखाद्याच इंद्रियाचे तज्ज्ञ असलात तरी ओळखीचे आणि नातेवाईक रुग्ण तुमच्याकडे चौकशीसाठी येतातच येतात.  म्हणतात तुझ्या ‘कन्सल्टिंग रूम’मध्ये नको तुझ्या घरी थोडा वेळ दे. या  ‘कन्सल्टिंग रूम’ला दवाखाना हा सोपा शब्द वापरण्याची पद्धत आता नाही. फार फार तर ‘क्लिनिक’  इथपर्यंतच मजल जाते आणि थांबते. खूप प्रवासानंतर जर तुम्ही कोणाकडे गेलात तर बायकांना बायका विचारतात ‘तुम्हाला Fresh व्हायचे असेल ना?’ पूर्वी जाऊन यायचे आहे का असे विचारत. ‘आता हा Fresh वाक्प्रचार रूढ झाला आहे. ते असो. या Fresh  झालेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरचा प्रवासाचा शीण मात्र तेवढाच राहतो. घरी येणाऱ्या रुग्णांबद्दल मी सांगत होतो. एक घरी आलेली ओळखीची बाई मला सांगू लागली ‘अरे रविन माझी हाडे ठिसूळ झाली आहेत.’ मी तिच्या डोक्याकडे बघू लागलो तर म्हणते, ‘तू जरा लक्ष देशील का?’ मी म्हटले ‘हा ठिसूळपणा तुला कसा कळला?’ तर म्हणाली, ‘मी एक खास तपासणी करून घेतली.’ ‘मी म्हटले तुला काय होत होते?’ ती म्हणाली, मला काहीच होत नव्हते. पण माझ्या मैत्रिणींनी करून घेतली म्हणून मीही करून घेतली. त्यांनी कोठेतरी वाचले की ४० वर्षांनंतर ही तपासणी सर्व स्त्रियांनी करून घ्यायला हवी. त्यांचे पैसे मात्र फुकट गेले, कारण त्यांच्या चाचण्यांत काहीच दोष निघाला नाही. माझे पैसे मला उपयोगी पडले. माझी हाडे ठिसूळ आहेत हे सिद्ध झाले. ‘मी म्हटले चाचणी काय म्हणते किती ठिसूळ झाली आहेत?’ ती म्हणाली, ‘जास्त नाही फक्त पाचच टक्के ठिसूळ आहेत.’ मी म्हणालो म्हणजे ९५ टक्के पैसे फुकट गेले. ‘तेव्हा रागावली आणि म्हणाली काय करू ते सांग.’ पुढे ती कॅल्शियम औषधे, इंजेक्शने घेऊ लागली. खरे तर, तू जास्त काळजी करू नकोस, जरा आहार सुधार एवढेच मी सांगितले होते. ४० वर्षांनंतर वरचेवर चाचण्या करणे आवश्यक आहे हे तर खरेच आहे. परंतु माणसांनी सजग राहावे आणि अतिरेक करू नये हेही खरे आहे.
आतली बातमी सांगतो. एखादे नवे उत्पादन खपावे म्हणून माध्यमांना हाताशी धरून किंवा त्यांना बेसावध ठेवून एखाद्या आजाराच्या बातम्या पसरवल्या जातात. या ठिसूळ हाडांचे तेच झाले. कॅल्शियमच्या उत्पादनाचा खप वाढला आणि या कॅल्शियमच्या दुष्परिणामाच्या बातम्या आता झळकू लागल्या आहेत. २० वर्षांपूर्वी प्रोस्टेट (पुरस्थ) ग्रंथींच्या कर्करोगाबद्दल असेच झाले. पन्नाशीत प्रत्येकाने याची चाचणी करावी अशी टूम निघाली आणि संशयास्पद चाचणी असे ठरवत हजारोंच्या शस्त्रक्रिया झाल्या. आता २० वर्षांनी केलेल्या पाहणीत असे आढळले की शस्त्रक्रिया न केलेले लोकही तेवढेच जगले. आधुनिक विज्ञान यशस्वी नक्कीच, पण त्याकडेही तिरप्या नजरेने बघावे लागते.    
रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet war and peace
First published on: 04-01-2013 at 01:24 IST