हातगाडय़ा रस्त्यावर ; रहिवासी त्रस्तडहाणू : डहाणू भाजी मार्केटसाठी गाळे दिले असताना तिथे ग्राहक वळत नसल्याने डहाणू शहरातील लोणीपाडा-इराणी रोड हा मुख्य रहदारीचा रस्ता अडवून फेरीवाल्यांनी हातगाडय़ा लावल्याने डहाणूकरांना रस्त्यातून मार्ग काढणे अवघड झाले आहे. तर डहाणू स्टेशनहून इराणी रोडकडे जाताना संपूर्ण रस्त्यावर हातगाडय़ा थाटल्या आहेत. त्यामुळे नगर परिषदेच्या भाजी मार्केटमध्ये ग्राहक न जाता रस्त्यावरील हातगाडय़ांवरून भाजी खरेदी करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. डहाणू पोलीस चौकीच्या पाठीमागे डहाणू नगरपालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी महात्मा गांधी भाजी मार्केट ही ५२ गाळय़ांची स्वतंत्र इमारत उभारून भाजी विक्रेत्यांचा जागेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भाजी विक्रेत्यांनी स्वत:च्या मनमानीने मार्केटच्या इमारतीत न बसता मुख्य रहदारीच्या रस्त्यावर जागा अडवून बेकायदा गाडय़ा थाटून अतिक्रमण केले आहे. डहाणू पोलीस ठाणेही यातून सुटले नाही. डहाणू पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडच्या चोहोबाजूंना विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने डहाणूचे पोलीस ठाणेच अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. डहाणू पालिका क्षेत्रातील रस्त्यावरील अतिक्रमणाला नगर परिषदेचे उदासीन धोरणच कारणीभूत असून डहाणूतील विक्रेत्यांचा जागेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात अपयशी ठरली आहे.थर्मल पावर रोड आणि इराणी रोडवर भाजी-फळे विकणाऱ्या फेरीवाल्यांनी थेट गाडय़ा थाटून रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतूकदार आणि रहिवाशांना दररोजच्या भांडणाला तोंड द्यावे लागत आहे. रिलायन्स थर्मल पॉवर या प्रकल्पाकडे जाण्यासाठी लोणीपाडा येथूनच एकमेव मार्ग आहे. तर डहाणू पोलीस स्टेशनच्या संरक्षक िभतीच्या सभोवती हातगाडींनी विळखा घातला आहे. थर्मल पॉवर रोड, पोलीस ठाण्याच्या आजूबाजूचा परिसर आणि इराणी रोड या भागात भाजी विक्रेत्यांनी जागेअभावी थेट रस्त्यावर उतरून दुकाने थाटल्याने वाहतूक आणि रहदारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. डहाणू नगर परिषदेचे भाजी विक्रेत्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण नाही. या सर्व गदारोळात डहाणूकरांना मात्र मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणाच्या दररोजच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र या मुख्य रस्त्यावरच फेरीवाल्यांनी गाडय़ा थाटल्याने पालिकेचा रस्ताच गायब झालेला आहे. फेरीवाल्यांनी रहिवाशांचा ये-जा करण्याचा मार्ग अडवला आहे. त्यामुळे दररोजच्या भांडणांनी लोक त्रस्त झाले आहेत. हातगाडय़ांची अतिक्रमणे दूर करून नगर परिषदेने यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.‘याबाबत नगर परिषदेचे नियोजन सुरू आहे. लवकरच त्यामध्ये बदल दिसून येईल.’- वैभव आवारे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद