कासा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या तवा, कोल्हान, धामटणे रस्त्याची खड्डे पडून अक्षरश: चाळण झाली आहे. पेठ, घरतपाडा, केदारपाडा वगैरे गावांना तसेच आसपासच्या सात ते आठ पाडय़ांना जोडणारा हा रस्ता खड्डय़ांमुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पालघर जिल्हा शब्दश: खेडय़ां-पाडय़ांचा आहे. परंतु तेथे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांची त्यांचीही दुरवस्था झालेलीआहे. तवा धामटणे रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता पेठ, घरतपाडा, केदारपाडा या गावांना तसेच आसपासच्या सात-आठ पाडय़ांना जोडतो. धामटणे, पेठ या गावांना घोळ या गावाकडूनही जोडणारा दुसरा रस्ता आहे. पण त्या रस्त्याची अवस्था काही वेगळी नाही. त्यामुळे या गावांमध्ये कोणत्याही मार्गाने पोहोचायचे झाले तरी खड्डे आहेतच.खड्डे चुकवताना गाडी घसरणे अथवा उलटण्याचे प्रकार होऊ शकतात. दुचाकीस्वारांना तर विशेष काळजी घ्यावी लागते. परंतु रस्त्याची इतकी दयनीय स्थिती झाली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक नेत्यांना जाग नाही. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, स्थानिक आमदार यापैकी कुणीतरी या समस्येचा विचार करून रस्तेबांधणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करेल, अशी स्थानिकांना आशा आहे.