वाडा : पालघर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या तीन कृषी अधिकाऱ्यांवर सात लाख २६ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.वाडा उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव, कृषी सहायक राजू नवघरे आणि कृषी पर्यवेक्षक अमोल दोंदे अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. २३ मार्चपासून पडताळणी केल्यानंतर ५ एप्रिल रोजी सायंकाळी संबंधितांवर कारवाई करण्यात आली. यातील मिलिंद जाधव ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले होते.जव्हार तालुक्यातील मौजे रायतळे येथील आदर्श गाव योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल पुढे पाठवण्यासाठी आरोपी राजू नवघरे आणि अमोल दोंदे यांनी लाच मागितली. प्रकल्पाचा सविस्तर आराखडा एक कोटी ४४ लाख रुपये असून, त्याच्या ४ टक्केप्रमाणे ५ लाख ७६ हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली होती. तर मिलिंद जाधव यांनी तक्रारदारांचे प्रलंबित काम प्रमाणित करून देण्यासाठी प्रकल्प अहवालाच्या १ टक्केप्रमाणे १ लाख ५० हजार रुपये अशी एकूण ७ लाख २६ हजार रुपयांची मागणी केली.