-
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. जाणून घेऊयात त्यांनी केलेले २० मोठे आरोप.
-
१. “उद्धव ठाकरे अशी किती लोकांची हकालपट्टी करणार आहेत. ५० आमदारांची हकालपट्टी केली आहे, आता १२ खासदार जाणार त्यांची हकालपट्टी तुम्ही करणार आहात. शिवाजीराव अढळराव पाटील, आनंदराव अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक जात आहेत त्यांची हकालपट्टी करणार आहात. मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का?,” अशी विचारणा रामदास कदम यांनी केली आहे.
-
-
२. “नारायण राणे गेले तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीमधून बाहेर पडल्यानंतर पुढच्या सीटवर मी बसलेलो असायचो याची आठवण ठेवा. हकालपट्टी तुम्ही केली नाही, तर मी तुम्हाला माझ्या मनातून काढलं आणि आधी राजीनामा फेकला,” असं रामदास कदम म्हणाले आहेत.
-
३. “५२ वर्ष काम करणाऱ्या एका शिवसैनिकावर राजीनामा देण्याची वेळ का येते याचं आत्मपरीक्षण करा. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ५१ आमदारांनी शिवसेना वाचवली असल्याने मी त्यांचे आभार मानतो,” असं प्रतिपादन रामदास कदम यांनी केलं.
-
४. “माझ्या मुलाच्या मतदारसंघात १० कोटींचा निधी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कसा दिला, त्याची यादीच देतो आता मी. ही अवस्था शिवसेनेच्या सर्व आमदारांची आहे.
-
५. अजित पवारांनी एक कलमी कार्यक्रम सुरू केला होता. ते सकाळी ७ वाजता मंत्रालयात जात होते. या माणसानं डाव साधला. जिथे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत, तिथे त्यांच्या पडलेल्या आमदाराला निधी देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यांचं १०० चं टार्गेट होतं.
-
६. “मुख्यमंत्री शिवसेनेचा बसवला आणि अजित पवारांना प्रशासकीय अनुभव चांगला असल्यामुळे त्यांनी तो डाव साधला”, असा आरोप रामदास कदम यांनी केला.
-
७. “एकनाथ शिंदे आणि आमदारांनी निर्णय घेतला नसता, तर पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते,” असा दावा रामदास कदम यांनी केला.
-
८. “उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नव्हती, करोना होता हे मान्य. पण शरद पवार कोकणात पक्ष कसा फोडत आहेत याचे फोटो मी तुम्हाला पाठवले होते.
-
९. “शिवसेनेतून कुणबी समाजाला फोडून त्यांना पदं दिली, पाच कोटी दिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही शरद पवार शिवसेना फोडत होते. सगळे आमदार सांगत असतानाही उद्धव ठाकरे शरद पवारांना सोडत नव्हते,” असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
-
१०. “शरद पवार अखेर शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले, त्यांचा डाव यशस्वी झाला. शरद पवारांना बाळासाहेब असताना जे जमलं नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन केलं,” असंही ते म्हणाले.
-
११. अडीच वर्षात हे घडलं म्हणून नशीब, अन्यथा पाच वर्षात संपूर्ण शिवसेना संपली असती असंही रामदास कदम यांनी सांगितलं.
-
१२. गुवाहाटीत जाऊन मी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत तयार केलं होतं. पण येथे आजुबाजूला असलेले नेते बैल, कुत्रे, रेडे आणि महिला आमदारांना वेश्या म्हणू लागले. हा काय बिहार आहे का?,” असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला.
-
१३. उद्धव ठाकरेंनी आजुबाजूला अनिल परब यांच्यासारखे जे लोक बसले आहेत त्यांच्या पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून द्यावं. शिवसेना पूर्ण संपण्याची वाट पाहू नका असा सल्लाही त्यांनी दिला.
-
१४. “मी १९७० सालापासून गेली ५२ वर्ष शिवसेनेचं काम केलं आहे. माझ्या स्वप्नात देखील आलं नव्हतं की माझ्यावर शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल. माझं ७९ वय सुरू झालं आहे. आमच्या आयुष्याची संध्याकाळ पक्षाच्या माध्यमातून अंधकारमय होईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं”, असं रामदास कदम म्हणाले आहेत.
-
१५. “मी उद्धव ठाकरेंना हात जोडून सांगितलं होतं की तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत बसू नका. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासोबत संघर्ष करण्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आजन्म संघर्ष केला. हिंदुत्व वाढवलं. आज सगळ्या जगात हिंदु ह्रदयसम्राट म्हणून बाळासाहेबांची ओळख आहे. साहेब गेल्यानंतर त्यांचा मुलगा त्याच राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपद स्वीकरतोय”, असं कदम यावेळी म्हणाले.
-
१६. “मी उद्धव ठाकरेंना हे सांगून त्या दिवशी मी मातोश्रीवरून बाहेर पडलो, तो आजपर्यंत मातोश्रीची पायरी चढलो नाही. मला हे सहन झालं नाही. हा पक्ष बाळासाहेबांच्या विचारांचा नाहीये. शरद पवारांनी शेवटी डाव साधला,” असा आरोप कदम यांनी केला.
-
१७. “आमच्या मनात भीती होती तेच झालं. उद्धव ठाकरे म्हणाले होते की बाळासाहेब भोळे आहेत. बाळासाहेब भोळे नव्हते. उद्धव ठाकरे भोळे आहेत. शरद पवारांचा डाव उद्धव ठाकरेंना समजला नाही. आज शरद पवारांनी आमचा पक्ष फोडलाय”, असं रामदास कदम यावेळी म्हणाले.
-
१८. “आदित्य ठाकरेंचं वय काय आणि आमदारांना काय बोलतायत याचं भान ठेवा,” असंही त्यांनी सुनावलं.
-
१९. आदित्य ठाकरे हे कोणतंही शासकीय पद अथवा मंत्रीपद नसताना आधी आपल्या केबिनमध्ये येऊन बसायचे आणि अधिकाऱ्यांच्या बैठकी घेण्यासाठी सांगायचे असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
-
२०. “प्लास्टिकबंदी मी केली, पण श्रेय आदित्य ठाकरेंना दिलं. मातोश्री मोठी होऊ द्या आपली असा विचार केला. मला कुठं माहिती होतं तेच आदित्य ठाकरे जे कालपर्यंत मला काका काका म्हणत होते ते मंत्रालयात माझं खातं घेऊन बसणार आहेत,” असा टोला कदम यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
![Gold Silver Price 26 July](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/05/Gold-Price-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचे भाव कोसळले; १० ग्रॅमचा भाव ऐकून आताच सराफा बाजार गाठाल!