लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमधील जेडीयू आणि उत्तर प्रदेशातील आरएलडी हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानं इंडिया आघाडीला आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. अशात आता असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन) पक्षदेखील या राज्यांत निवडणूक लढविणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांत इंडिया आघाडीपुढे आणखी एक नवं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

एआयएमआयएमनं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास पक्षाकडून अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे ही मतं इंडिया आघाडीपासून दूर जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- एआयएमआयएम उत्तर प्रदेशात २० आणि बिहारमध्ये जवळपास सात जागांवर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

arjun modhvadiya
गुजरातमध्ये विक्रमी मताधिक्याचा भाजपचा प्रयत्न
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?
lok sabha election in madhya pradesh crisis in madhya pradesh congress
घाऊक पक्षांतर मध्य प्रदेशात काँग्रेससाठी चिंतेचे

हेही वाचा – ‘राहुल यात्रा’ आज गुजरातमध्ये दाखल; मरणासन्न काँग्रेसला संजीवनी मिळणार का?

महत्त्वाचे म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमआयएमने बिहारमध्ये केवळ एक जागा लढवली होती. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाच जागांवर विजय मिळवला होता. यापैकी मुस्लीमबहुल असलेल्या सीमांचल प्रदेशात एमआयएमआयएमने चांगली कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या पाचपैकी चार आमदारांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला. त्यामुळेच एआयएमआयएमने आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं जात आहे.

या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी, ”बिहारमध्ये आरजेडी इंडिया आघाडीबरोबर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी आमचे चार आमदार फोडले. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही”, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच एआयएमआयएम पक्ष इंडिया आघाडीबरोबर का नाही, असा प्रश्न विचारला असता, याचं उत्तर इंडिया आघाडीतील नेतेच देऊ शकतील, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

ओवैसींव्यतिरिक्त एआयएमआयएमचे बिहार प्रवक्ते आदिल हसन यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली. “किशनगंजव्यतिरिक्त आम्ही कटिहार, पूर्णिया, अररिया, दरभंगा, मधुबनी व गया येथे निवडणूक लढवू इच्छितो. आम्ही युतीसाठी बसपाशी चर्चा करीत आहोत. मात्र, याबाबतचा निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील. आम्ही समविचारी पक्ष असून, २०२० मध्येदेखील एकत्र निवडणूक लढवली आहे”, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशबाबत बोलायचं झाल्यास, २०१९ मध्ये एआयएमआयएमनं या राज्यात लोकसभा निवडणूक लढवली नसली तरी २०१७ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवार दिले होते. या निवडणुकीत त्यांनी ३२ जागांवर विजय मिळविला होता. तसेच २०२२ साली उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी उमेदवार दिले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नसली तरी त्यांना १० पेक्षा जास्त जागांवर मिळालेली मते समाजवादी पक्षाच्या पराभूत उमेदवारांच्या फरकाएवढी होती.

हेही वाचा – तब्बल २५ वर्षांनंतर मनोमिलन; विदेशातील नोकरी सोडून ‘तो’ आला बीजेडीमध्ये!

या संदर्भात बोलताना उत्तर प्रदेशातील एआयएमआयएमचे प्रवक्ते शौकत अली म्हणाले, “यूपीमध्ये आम्ही २० जागा लढविण्याचा विचार करीत आहोत. आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामध्ये संभल, मुरादाबाद, अमरोहा, बिजनौर, सहारनपूर, कानपूर व जौनपूर या जागांचा समावेश आहे.”

उत्तर प्रदेश आणि बिहारव्यतिरिक्त एआयएमआयएम महाराष्ट्रातदेखील निवडणूक लढविणार असून, ते यावेळी मराठवाड्याबरोबरच मुंबईतही उमेदवार देण्याची शक्यता आहे. तसेच आपले होमग्राऊंड असलेल्या तेलंगणातील हैदराबादव्यतिरिक्त सिकंदराबादमध्येदेखील ते निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ते पश्चिम बंगालमध्ये उमेदवार उभे करतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता आहे. महत्त्वाचे म्हणजे २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने पश्चिम बंगालमध्येही उमेदवार उभे केले होते.

या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ओवैसी म्हणाले, “आम्ही तेलंगणातील हैदराबाद, महाराष्ट्रातील औरंगाबाद व बिहारमधील किशनगंज येथे निवडणूक लढविणार आहोत. मात्र, बिहारमधील आमच्या पक्षाने आणखी जागांची मागणी केली आहे. तसेच उत्तर प्रदेशातूनही अशाच प्रकारची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे या राज्यात नेमक्या किती जागा लढवायच्या याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ.”