नॅशनल कॉन्फरन्स (NC) ने सोमवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते मियां अल्ताफ अहमद लाहरवी यांना अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली, जो नॅशनल कॉन्फरन्सच्या इंडिया आघाडीच्या भागीदार आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचा गृह मतदारसंघ आहे. २०१४ मध्ये अनंतनागमधून विजयी झालेल्या मेहबूबा आणि त्यांचे वडील व पीडीपीचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद या दोघांनीही संसदेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

लाहरवी हे मध्य काश्मीरमधील कंगनचे पाच वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी फारुख आणि ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आहे. उमेदवारीची घोषणा करताना ओमर म्हणाले, “अनंतनाग-राजौरी जागेसाठी मियांसाहेबांपेक्षा चांगला उमेदवार नाही. लोक त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीशी परिचित आहेत. त्यांनी कधीही धर्म किंवा जातीच्या आधारावर मते मागितली नाहीत, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

नॅशनल कॉन्फरन्स काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या तिन्ही जागा लढवू इच्छित आहेत आणि त्यावर ठाम राहण्याच्या निर्णयामुळे खोऱ्यातील राजकीय पक्षांची युती असलेल्या पीपल्स अलायन्स फॉर द गुपकर डिक्लेरेशन (PAGD) वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जम्मू आणि काश्मीरला पुन्हा एकदा विशेष दर्जा मिळावा, यासाठी २०२० मध्ये ही आघाडी स्थापन करण्यात आली होती.

पीडीपीने मेहबूबा यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा केलेली नसली तरी गेल्या काही दिवसांपासून त्या राजौरीत ये-जा करीत आहेत. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबद्दल १२५ कोटी भारतीयांसमोर एकजुटीने आवाज मांडण्यासाठी पीडीपी एक पक्ष म्हणून एकसंध शक्ती म्हणून निवडणूक लढवण्याचा विचार करीत होता. दुर्दैवाने काही घटकांनी लोकांची इच्छा धुडकावून लावत पीएजीडीपासून फारकत घेतली, असेही पीडीपीचे प्रवक्ते मोहित भान यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. यापुढे पीडीपी समविचारी लोकांना बरोबर घेऊन संघटनांच्या पाठिंब्याने एकट्याने पुढे जाणार आहे. पीडीपीची निवडणूक समिती लवकरच उमेदवारांची यादी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इतर जबाबदाऱ्यांवर निर्णय घेईल,” असंही भान म्हणाले.

हेही वाचाः मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान

मतदारसंघाची फेररचना कोणाच्या फायद्याची?

मे २०२२ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्ण झालेल्या सीमांकनाने अनंतनाग-राजौरी लोकसभा जागेच्या भौगोलिक सीमा आणि लोकसंख्याशास्त्रीय रचना बदलली आहे, जी पूर्वी दक्षिण काश्मीरच्या चार जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. परंतु आता पीर पंजाल ओलांडून पुंछ आणि राजौरीमध्ये ती पसरली आहे. दक्षिण काश्मीर जिल्ह्यांमध्ये काश्मिरी मुस्लिमांचे प्राबल्य आहे, तर पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये गुज्जर आणि पहाडी समुदायांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. राजकारण आणि धर्माचा कौटुंबिक वारसा पुढे नेणाऱ्या लाहरवीसारख्या प्रमुख गुज्जर धार्मिक नेत्याला मैदानात उतरवून नॅशनल कॉन्फरन्सला समाजाची मते मिळण्याची आशा आहे. या जागेवर इतर पक्षांची असलेली पकड विस्कळीत करून गुज्जर-बकरवाल-बहुल पट्ट्यांचा फायदा घेऊन काश्मीरमध्ये प्रवेश करण्याचा भाजपाचा विचार आहे.

पूर्वी अनंतनाग संसदीय जागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघाचे लोकसभेत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी न्यायमूर्ती (निवृत्त) हसनैन मसूदी यांनी प्रतिनिधित्व केले होते. २०१९ मध्ये त्यांनी ३२ टक्के मते मिळविली आणि काँग्रेसच्या जी ए मीर यांचा ६ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. ३० हजारांपेक्षा थोडी जास्त मते मिळाल्यानंतर मुफ्ती तिसऱ्या स्थानावर होत्या. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पक्षाला जागा देणार नाही, असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले. २०१४ मध्ये मेहबूबा मुफ्ती यांना ५३ टक्के मते मिळाली होती. त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या मिर्झा मेहबूब बेग यांचा ६५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. बेग सध्या पीडीपीमध्ये आहेत.