केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय जनता पार्टीचे जुने मित्र आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नितीशकुमार यांनी सुमारे पाच वेळाआपल्या मित्रपक्षांशी असलेली युती तोडली. तरीही ते सत्तेत कायम आहेत, अशी टीका शाह यांनी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी बिहार दौऱ्यावर आले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त सरण जिल्ह्यातील एका गावात आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला. ज्याने पाच वेळा युती बदलली आहे, तोच मुख्यमंत्री आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

हेही वाचा- राजीनामा नामंजूर करून उमेदवारी रद्द करण्याच्या २०१९ अकोला लोकसभा निवडणुकीतील खेळीचा ऋतुजा लटके यांच्यावर प्रयोग

अमित शाहांनी नितीशकुमारांच्या राजकीय कारकीर्दीचा उल्लेख करताना म्हटलं की, नितीशकुमारांनी जनता दलाशी फारकत घेऊन समता पक्षाची स्थापना केली होती. यानंतर त्यांनी काही काळ सीपीआय (एमएल) या पक्षाशी जवळीक साधली. पुढे भाजपासोबत दीर्घ युती केल्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी भाजपासोबतची युती तोडली. हा काडीमोड घेतल्यानंतर पाच वर्षांनी २०१७ मध्ये नितीशकुमार पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परतले, अशी टीका अमित शाहांनी केली.

हेही वाचा- शिंदे गटाने सुषमा अंधारेंना दिली होती ‘ऑफर’? स्वत:च केला मोठा खुलासा

१५ मिनिटं केलेल्या भाषणातून शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या विविध कल्याणकारी उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली. जयप्रकाश नारायण आणि गांधीवादी नेते विनोबा भावे यांच्या तत्त्वज्ञानानुसारच भाजपानं काम केलं, असा दावाही अमित शाह यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे मागील तीन आठवड्यांच्या कालावधीत अमित शाह यांचा हा दुसरा बिहार दौरा होता. याआधी २३-२४ सप्टेंबर रोजी अमित शाह बिहार दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पूर्णिया आणि किशनगंज जिल्ह्यांतील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. बिहारमधील सत्ता गेल्याने धीर सोडू नका. तुमचं मनोधैर्य उंचावत ठेवण्यासाठी मी वारंवार बिहारला भेट देणार आहे, असं अमित शाह त्यावेळी म्हणाले होते.