संतोष मासोळे

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेनेतून जणूकाही शिंदे गटाकडे जाणाऱ्यांची रीघ लागली. अशावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आमदारांना केलेल्या भावनिक आवाहनानंतर धुळ्याचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी त्वरित प्रतिसाद देत काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडत मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात एक-दोन पदाधिकारी शिंदे गटात गेले असले तरी त्यामुळे शहरातील शिवसेनेच्या ताकदीवर फारसा परिणाम झालेला नाही हे लक्षात घेऊनच आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील समीकरणांचे आडाखे मांडत शरद पाटील पुन्हा शिवसेनेत दाखल झाल्याचे दिसते.

chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….
dhairyasheel mohite patil marathi news
मोहिते-पाटील यांच्या बंडामुळे माढ्यातील राजकीय समीकरणे बदलली
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय

शिवसेनेचे उमेदवार म्हणून २००४ मध्ये शरद पाटील यांनी त्यावेळचे मुख्यमंत्रिपदाचे इच्छुक काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव करत खळबळ उडवली होती. शरद पाटील यांनी काँग्रेसमधून समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली. विद्यार्थीदशेतच त्यांनी धुळ्याच्या सामाजिक पटलावर भरीव काम केले. नंतर अभ्यासूवृत्ती आणि प्राध्यापक असल्यामुळे सुसंस्कृत प्रतिमा या जोरावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली.

कालांतराने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसची विचारसरणी असलेल्या भागात त्यांच्या प्रयत्नांमुळे शिवसेनेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही चांगले यश मिळाले. जिल्हा परिषदेत ऐतिहासिक सत्तांतर झाले आणि अध्यक्षपद शिवसेनेकडे आले होते. धुळे पंचायत समितीच्या सभापतीपदावरही शिवसेनेची मोहोर उमटल्यावर शिवसेनेत उत्साह संचारला होता. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शरद पाटील यांच्या रूपाने शिवसेनेला एक आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही यश मिळवून देणारा नेता सापडला. साहजिकच जिल्ह्यात सेनेची ताकद वाढली होती. दरवर्षी दिवाळीला सालदारांच्या घरी जाऊन त्यांचा सपत्निक सन्मान करणे, शेतकरी आत्महत्येमुळे विधवा झालेल्या भगिनींना भाऊबिजेच्या दिवशी साडीचोळी आणि भेटवस्तू देणे, ३१ डिसेंबरला रक्तदान शिबीर घेणे, हे प्रा. पाटील यांचे दरवर्षीचे उपक्रम आहेत. या उपक्रमांमुळे त्यांची लोकप्रियता वाढण्यात मदत झाली आहे.

शिवसेनेत पक्षांतर्गत कुरबुरी आणि हेव्यादाव्यांना सुरुवात झाल्यावर त्याचा फटका शरद पाटील यांनाही बसला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रोहिदास पाटील यांचे पुत्र काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी ग्रामीण भागात शिवसेना वाढीसाठी विविध कार्यक्रम घेतले. आपला दबदबा निर्माण केला. माळी यांचा हेतू लक्षात घेत पाटील यांनीही ग्रामीण भागापेक्षा शहरात अधिक लक्ष घातले. पाटील यांना शहर मतदार संघातून निवडणूक लढवायची होती, परंतु, २०१९ च्या निवडणुकीत सर्व उलट झाले. माळी यांना ग्रामीणऐवजी शहर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेने उमेदवारी दिल्याने शरद पाटील नाराज झाले. त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहण्यास सुरुवात केली.काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्याने शरद पाटील यांनी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस प्रवेश झाल्यावर त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर पाटील यांनी केलेला शिवसेना प्रवेश हा शिवसेनेसाठी दिलासादायक म्हणता येईल. शिवसेनेत प्रवेश करण्यामागे पाटील यांची भविष्यातील काही गणिते आहेत. विधानसभेच्या मागील निवडणुकीत शहर मतदारसंघात धार्मिक आणि जातीय समीकरणामुळे शिवसेनेला पराभव पत्करावा लागला होता. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून किंवा स्वतंत्रपणे शिवसेनेने निवडणूक लढविण्याचे ठरविल्यास पाटील हाच चेहरा त्यांच्यापुढे उमेदवार म्हणून राहणार आहे. भविष्यात भाजप-सेना युती झाली तरी मतदारसंघ याआधीच्या युतीवेळी शिवसेनेच्या वाट्याला होता, हे लक्षात घेण्यासारखे आहे. शहरी भागात पाटील यांना मानणारा वर्ग अधिक आहे. एक-दोन पदाधिकारी शिंदे गटात गेले असले तरी त्यामुळे शहरातील शिवसेनेच्या ताकदीवर फारसा परिणाम झालेला नाही. भविष्यातील सर्व गणित चपखलपणे पाटील यांच्या बाजूने असल्यानेच त्यांनी शिवसेनेच्या पडझडीच्या काळात पुन्हा प्रवेश करत पक्षप्रमुख तसेच सामान्य शिवसैनिकांचा विश्वास मिळविला आहे. सुखात असताना सर्वच जण साथ देतात, परंतु, दु:खावेळी साथ देणे अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांना साथ दिली, ही प्रा. पाटील यांची प्रतिक्रिया यादृष्टीने बोलकी आहे.