येत्या १२ नोव्हेंबररोजी हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी भाजपाकडून उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीवरून भाजपाच्या गोटात चिंतेच वातावरण आहे. या यादीत आपले नाव नसल्याने अनेक उमेदवारांनी पार्टी सोडण्याचा तर काहीही अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ‘ आप ‘ निर्भर हवं की ‘आत्मनिर्भर ‘, अमित शाह यांचा दिल्लीवसियांना सवाल

भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ६८ उमेदवारांची याची जाहीर केली आहे. या यादीतून भाजपाने ११ विद्यमान आमदारांना वगळले आहे. तर काहीच्या जागांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे अनेक नाराज आमदारांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी पक्ष सोडण्याचीही धमकी दिली आहे.

भाजपाकडून यापूर्वी ६२ उमेदावारीच यादी जाहीर केली होती. तर उर्वरित सहा उमेदवारांची यादी काल जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपाने चंबा विधानसभा मतदार संघातून इंदिरा कपूर यांच्या जागी विद्यमान आमदार पवन नय्यर यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. इंदिरा कपूर यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल असल्याचे कारण भाजपाने दिले. तर कुल्लूमधून माहेश्वर सिंग आणि हरोलीमधून रामकुमार यांना उमेदवारी दिली आहे. तसेच रमेश धवला आणि रविंदर सिंग यांच्या जागांमध्ये बदल केले आहेत. पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे दोन्ही नेत्यांचे समर्थक नाराज झाले आहेत.

हेही वाचा – Himachal Pradesh Election: हिमाचल प्रदेशात प्रियांका गांधींच्या आठ सभा, भाजपाला टक्कर देण्यासाठी उतरणार रिंगणात

भाजपाने ज्या ११ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले, त्यात भाजपाचे मीडिया प्रभारी मंदी सरदार यांचाही समावेश आहे. त्यांनी आणि प्रवीण शर्मा यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच मंत्री महेंद्रसिंग ठाकूर यांच्या कन्या वंदना गुलेरिया यांनी आपल्या धाकट्या भावाला धरमपूरमधून तिकीट दिल्याने भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. तर नालागडमध्ये, नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या लखविंदर सिंग राणा यांना तिकीट मिळाल्याने भाजपचे माजी आमदार के एल ठाकूर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर धर्मशालामध्ये ‘आप’मधून भाजपात गेलेल्या राकेश चौधरी यांना तिकीट मिळाल्याने भाजपचे आमदार विशाल नैहरिया यांच्या जवळपास 200 समर्थकांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.