कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला गती आली असताना हातकणंगले मध्ये नाराजीसत्र सुरु असल्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारची रात्र अक्षरशः जागवली. शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह महत्वाच्या जोडण्या लावल्याने उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना आधार मिळाला आहे. आमदार विनय कोरे यांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी भेटीनंतरही लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवल्याने यापातळीवर महायुतीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला प्रयत्न करावे लागतील असे दिसत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागत आहे. कोल्हापूर मतदारसंघात खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. त्यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांनी मतदारसंघ पिजून काढायला सुरुवात केली आहे. तुलनेने हातकणंगले मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. धैर्यशील माने यांची उमेदवारी २८ मार्च रोजी जाहीर झाली. त्यांचा प्रचाराला अपेक्षित गती मिळालेली नाही. अशातच इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, शिरोळचे शिंदेसेनेचे राजेंद्र पाटील यड्रावकर व इचलकरंजीचे ताराराणी आघाडीचे प्रकाश आवाडे या तिन्ही अपक्ष आमदारांनी डावपेच आखले असून त्याला भाजपच्या नेतृत्वाचे छुपे पाठबळ असल्याची चर्चा आहे. या घडामोडींची दखल घेत लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणीवपूर्वक कोल्हापूरकडे वाट वाकडी केल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?

रात्रीस खेळ चाले

मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरात आमदार आवाडे, आमदार पाटील यड्रावकर आणि आमदार कोरे यांच्याशी चर्चा केली. आवाडे यांनी या भेटीनंतरही निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. तर कोरे, यड्रावकर यांची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले जाते. हातकणंगले मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे डॅमेज कंट्रोल बऱ्यापैकी कामाला आल्याचा दावा केला जात आहे. तरीही शिंदे यांना खासदार धैर्यशील माने यांची परिस्थिती सुधारावी यासाठी रात्र जागवत गाठीभेटीवर भर द्यावा लागला.

शिरोळचे पाठबळ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन मविआचे उमेदवार सत्यजित पाटील यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरल्याची चर्चा आहे. आवाडे यांनीही यड्रावकर- कोरे या आमदारांना अशीच गळ घातली आहे. या घटनांचे गांभीर्य उमजून मुख्यमंत्री शिंदे यांनी धैर्यशील माने यांच्या समवेत पहाटे जयसिंगपूर गाठून त्यांच्या गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. धैर्यशील माने यांच्या उमेदवारीमुळे नाराज होऊन राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांचे भाऊ संजय पाटील यड्रावकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालवले होते. तेही या भेटीवेळी उपस्थित होते. तर, शिरोळ मधील गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे, कुरुंवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन कामाला लागण्याची ग्वाही दिली आहे. माने यांच्या एका प्रचारसभेला लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले शिरोळ तालुक्यातील भाजपचे नेते संजय पाटील तसेच मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा : उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज

पन्हाळ्यात समेट

जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांची भूमिका या मतदारसंघाबाबत निर्णायक आहे. पन्हाळा – शाहूवाडी मतदारसंघातील माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना ठाकरेसेनेची उमेदवारी मिळाली आहे. सरुडकर यांना रोखण्यात कोरे यांची ताकद महत्वाची ठरणार आहे. त्यांचे राजकीय वजन लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी विनय कोरे यांची वारणानगर येथे मध्यरात्री भेट घेऊन रात्रभोजन केले. हि डिनर डिप्लोमसी पथ्यावर पडेल अशी सोय लावली गेली आहे. एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीने कृष्णा – वारणा काठ प्रचारासाठी प्रवाहित होणार दिसत असून तो नाराजीनाट्याने पेचात सापडलेल्या धैर्यशील माने यांच्यासाठी दिलासा ठरत आहे. कोण सोबत कोण विरोधात हे उमेदवारी अर्ज भरताना लवकरच दिसून येईल.