जालना : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपने सहाव्यांदा जालना लोकसभेची उमेदवारी जाहीर करणे अपेक्षितच होते. यंदा त्यांना निवडणूक सोपी जाणार की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका बसणार याची आता चर्चा सुरू झाली आहे. मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची असलेली ताकद लक्षात घेता युतीत मिळणाऱया मतांचा खड्डा भरून काढण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल. यापूर्वी सलग पाच वेळेस ते या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यापूर्वी ते सलग दोन वेळेस जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघातून ते भाजपकडून निवडून आले होते. म्हणजे दहा वर्षे आमदार, २५ वर्षे खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे.

सहाव्यांदा निवडणुकीस आपल्यालाच उभे राहावे लागणार असल्याचे गृहीत धरून त्यांनी या मतदारसंघातील आपला संपर्क कायम ठेवण्याचा मागील पाच वर्षे प्रयत्न केलेला आहे. आमदारकीची दहा वर्षे आणि त्यानंतरच्या खासदारकीच्या १५ वर्षांच्या काळात जालना लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर महाराष्ट्रात त्यांची आता आहे एवढी ओळख नव्हती. मागील दहा वर्षांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर तसेच केंद्रीय राज्यमंत्री पदावर काम करताना महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांचा खऱ्या अर्थाने परिचय झाला.

Pankaja Munde Pritam Munde
आता प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा; पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!
congress
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा
EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)
“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?

हेही वाचा : नगरमधील सारे विखे-पाटील विरोधक लंके यांच्या पाठीशी ?

दानवे यांचा परिचय सांसदीय राजकारणापुरताच मर्यादित नाही तर ते ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापतिपदापासून राजकारणात पुढे आलेले नेते आहेत. गावपातळीवरील विविध कार्यकारी सहकारी संस्थांपासून ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणावर एकदा नव्हे तर अनेकदा वर्चस्व स्थापन करणारे नेते म्हणून त्यांचा परिचय आहे.

मागील तीन-चार वर्षे गावपातळीवर भाजप पक्षाच्या मजबुतीसाठी त्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केलेले आहेत. लोकसभा निवडणूक लढविताना त्यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून विविध कामांच्या माध्यमातून भाजपने म्हणजे पर्यायाने रावसाहेब दानवे यांनी जेवढे प्रयत्न गेल्या तीन-चार वर्षांत केले तेवढे प्रयत्न त्यांच्या विरोधातील पक्षांकडून झालेले नाहीत. या लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा सदस्य महायुतीचे असून ती दानवे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. निवडणुकीच्या राजकारणातील वाकबगार पुढारी अशी ओळख निर्माण झालेल्या दानवेंचा अगदी गावपातळीवरील मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न असतो. गेल्या चार-पाच वर्षांत इतर पक्षांतील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत. मतदान केंद्रनिहाय पक्षबांधणी करणे आणि गावपातळीवर अन्य पक्षांच्या प्रभावशाली मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे ही जमेची बाजू दानवे यांच्या संदर्भात आहे.

हेही वाचा : Electoral Bonds Data: निवडणूक रोख्यांमधून हजारो कोटी दान करणारे ‘दानशूर’ कोण आहेत माहितीये? वाचा पहिल्या २० दात्यांची माहिती!

केंद्रीय राज्यमंत्री पदावर असल्याने विविध विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून ते जनतेसमोर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा दृष्टिकोन आणि मतदारसंघात झालेली तसेच होऊ घातलेली विकासकामे या मुद्द्यांवर त्यांच्या भाषणांचा भर असतो. असे असले तरी काही उणिवांची चर्चाही त्यांच्या संदर्भात असते. मागील निवडणुकीच्या वेळी तत्कालिन शिवसेना त्यांच्यासोबत होती. त्यावेळी पडलेली शिवसेनेची मते या वेळेस कशी भरून काढायची, असा प्रश्न भाजपसमोर आहे. शिवसेनेचे दोन गट झाले असले तरी भाजपच्या विरोधात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मोठे अस्तित्व या लोकसभा मतदारसंघात आहे. याशिवाय काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावेळेस एकत्रितरीत्या दानवे यांच्या विरोधात असणार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नसला तरी हे आव्हान परतवून लावण्याचा प्रश्न भाजपासमोर आहे.

हेही वाचा : Electoral Bond Data : निवडणूक रोख्यांसाठी भाजपानंतर ‘या’ पक्षाला देशात सर्वाधिक पसंती!

या लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यातील तर तीन विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. यापैकी जालना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे, तर बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षासह शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर दानवे यांच्यासमोरील आव्हानांची स्पष्टता खऱ्या अर्थाने समोर येईल.