कोल्हापूर : लोकसभा निवडणुका सरल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात यातील सर्वात मोठा सामना पाहायला मिळणार आहे. येथे मागील वेळा प्रमाणेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंहराजे घाटगे व ठाकरे सेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांच्यात तिरंगी लढत निश्चित मानली जात असून त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

या वेळी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात चर्चेत राहील ती कागल विधानसभा मतदारसंघातील लढत. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पाच वेळा विजय मिळवला आहे. गेल्या वेळी भाजपचे उमेदवारी मिळावी यासाठी समरजित घाटगे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा कागल विधानसभा मतदारसंघात आणून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने येथे संजय घाटगे यांना उमेदवारी मिळाली.

हेही वाचा : कंगना रणौतच्या मतदारसंघात लूण लोटा प्रथेची चर्चा; देवाची भीती दाखवून केला जातोय प्रचार

निराश न होता समरजित घाटगे यांनी ही निवडणूक अपक्ष लढवत ८८,३०३ मते घेतली. मुश्रीफ यांनी १ लाख १६ हजार अशी सर्वाधिक मते घेऊन विजयाची नोंद केली. त्यांनी घाटगे यांच्यावर २८,१३३ मतांनी विजय मिळवला. ही माझी शेवटची निवडणूक आहे असे भावनिक आवाहन करणारे संजय घाटगे यांना ५५,६५७ मते मिळाली होती.

मुश्रीफ – घाटगे मैत्री

यावेळी संजय घाडगे निवडणूक लढवणार का याबद्दल स्पष्टता नाही. त्यांचे सुपुत्र अंबरीश घाटगे रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. कागल पंचायत समिती सभापती, गोकुळ दूध संघ, जिल्हा परिषद सभापती राहिलेले अंबरीश हे निवडणुकांमध्ये अपराजित म्हणून ओळखले जातात. ते विधानसभा निवडणुकीला उभे राहिले तर पराभूत न होण्याची मालिका पुढे सुरु राहणार का हा प्रश्न आहे. हसन मुश्रीफ – संजय घाटगे यांची मैत्री जगजाहीर आहे. या मैत्रीचे आगामी विधानसभा निवडणुकीत संबंध कसे राहणार, कोण कोणाला उघड – छुपी मदत करणार यावरही निकाल अवलंबून असणार आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी मणिपूरला का गेले नाहीत? अमित शाहांनी सांगितले खरे कारण

मंडलिकांची भूमिका

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक होते. विधानसभा निवडणुकीला परतफेड म्हणून त्यांनी आमच्या गटाला मदत केलीच पाहिजे असे संदेश कागल मध्ये गटातटाकडून येत राहिले. त्यावर मुश्रीफ यांनी आता मंडलिक यांना मदत करूया. त्यामध्ये गट तट आणायला नको, असे सांगून वादाच्या प्रसंगावर एकोपा घडवला होता. शिवाय त्याच वेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्या घाटगे यांना शुभेच्छा राहतील असेही म्हटले होते. सध्या मुश्रीफ आणि घाटगे हे दोघेही महायुतीमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कोण कोणासोबत राहणार हे आजघडीला निश्चित नसले तरी कागल मध्ये हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात असणार हे बाकी निश्चित. यामुळे विधानसभा निवडणुकीलापुन्हा एकदा मागील प्रमाणेच प्रमाणे तिरंगी सामना अटळ असताना मंडलिक कोणाला मदत करणार याची चर्चा आहे.

हेही वाचा : भाजपाविरोधात पंजाबमधील शेतकर्‍यांचा रोष, तरीही दुप्पट मतांनी निवडून येण्याचा विश्वास; कारण काय?

साखर सम्राटांमध्ये मुकाबला

विशेष तिघेही उमेदवार साखर सम्राट म्हणून ओळखले जातात. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी स्थापन केलेल्या शाहू सहकारी कारखान्याची धुरा समरजित घाटगे यांनी समर्थपणे पुढे चालवीत आहेत. स्वतःच्या ताकदीवर स्थापन केलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे हा खाजगी साखर कारखाना अल्पावधीला नावावर रूपाला आणण्याचे श्रेय मुश्रीफ यांना आहे. मुश्रीफ हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या सहकार्यामुळे संजय घाटगे यांनी अन्नपूर्णा साखर कारखाना सुरू केला आहे. त्यामुळे विजयाचा गोडवा नेमका कोणाला मिळणार याकडेही लक्ष असणार आहे.