महेश सरलष्कर

दिल्लीत दोन वर्षांच्या कालावधीनंतर रविवारी झालेल्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी ऐक्याची हाक दिली असली तरी, या अधिवेशनाची सांगता मात्र अजित पवार यांच्या नाराजीनाट्याने झाली! विनंती करूनही अजित पवार भाषण न करताच व्यासपीठावरून निघून गेल्याने अधिवेशनातील गोंधळात अधिक भर पडली.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर शरद पवारांनी प्रारंभी भाषण करून अधिवेशनाची दिशा निश्चित केली. त्यांच्या नंतर, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, पी. सी. चाको, फौजिया खान यांची भाषणे झाली. या नेत्यांच्या भाषणानंतर पवार समारोपाचे भाषण करतील असे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. पण, हे अधिवेशन राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आयोजित केल्यामुळे युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनाही बोलण्याची संधी दिली गेली. त्यापूर्वी खासदार अमोल कोल्हे यांचे दमदार भाषण झाले. कोल्हेंचे भाषण झाले पण, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भाषणाची संधी दिली नसल्याचे लक्षात येताच, पटेल यांनी पाटील यांना भाषणाचा आग्रह केला. नाइलाजाने जयंत पाटील भाषण केले. ‘माझ्या आधी कोल्हे यांनी इतके जबरदस्त भाषण केले की मला आता बोलण्याजोगे काही उरलेले नाही’, असे म्हणत पाटील यांनी दहा मिनिटे भाषण केले.

‘जयंत पाटील यांच्यानंतर आता अजित पवार बोलतील’, अशी घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. वास्तविक, सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांचे कौतुक केल्यानंतर अजितदादांना टाळ्यांच्या कडकडाटात कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला होता. माजी अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी आर्थिक व्यवस्थापनाचे चोख काम पार पाडले असल्याचे महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटले असल्याचे सुळे सांगितले. या सगळ्या नेत्यांची भाषणे होईपर्यंत अजित पवार व्यासपीठावर बसून होते.

सभागृहातून अजित पवार यांनी भाषण करण्याची मागणी होऊ लागली. तोपर्यंत जयंत पाटील यांचे भाषण सुरू झाले. कार्यकर्त्यांकडून भाषणाची विनंती होऊ लागल्यानंतर अजित पवार व्यासपीठावरून खाली निघून गेले. प्रफुल्ल पटेल यांनी, जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्याआधी, ‘अजित पवारही खास आग्रहाखातर भाषण करतील’, असे कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले. पण, अजित पवार निघून गेले. त्यावर, ‘अजितदादा आत्तापर्यंत इथे होते, तुम्ही आग्रह केल्यामुळे ते निघून गेले. ते वॉशरूमला गेले आहेत, ते परत येईपर्यंत आपण वाट पाहू’, असे पटेल म्हणाले. पण, अजित पवार परत आले नाहीत. अखेर अजित पवारांची वाट पाहून शरद पवार यांनी समारोपाचे भाषण केले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या इतक्या सगळ्या नेत्यांना बोलण्याची संधी दिली गेली, अगदी जयंत पाटील यांनी देखील अजित पवार यांच्याआधी भाषण केले. ज्येष्ठ नेते, खासदार यांच्यामध्ये मान राखला गेला नाही, जयंत पाटील यांनाही अधिक महत्त्व दिले गेले, या कारणांमुळे अजित पवार नाराजी होऊन व्यासपीठावरून निघून गेल्याची नाराजीनाट्याची चर्चा अधिवेशनाच्या आवारात अधिक रंगली होती. ‘मी महाराष्ट्रातील नेता असून राज्यात जाऊन मी बोलेन’, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली. पण, शरद पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार भाषण न करता व्यासपीठावरून खाली उतरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.