लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी राज्यात एकाच मुद्द्याने राजकारण तापलेले होते आणि तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा! परभणी जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या अगदी छोट्याशा गावामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेले आंदोलन बघता बघता राज्यव्यापी झाले आणि ते या आंदोलनाचा मुख्य चेहरा झाले. मराठा आरक्षणाची लढाई त्याआधीपासूनच सुरू झाली असली तरी तिला चेहरा मात्र मिळाला नव्हता. तो चेहरा मनोज जरांगे यांनी छेडलेल्या आंदोलनामुळे मिळाला. मात्र, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मनोज जरांगे पाटील कुठे आहेत? अंतरवाली सराटीमध्ये नेमके काय घडतेय? तिथले गावकरी आणि एकूणच परभणी मतदारसंघातील राजकारण यांच्यावर मराठा आंदोलनाचा प्रभाव कसा आणि किती आहे, याचा आढावा आपण घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतरवाली सराटीतील आंदोलनाचा मांडव आजही तसाच!

सात महिन्यांपासून अंतरवाली सराटीमधील आंदोलनाच्या ठिकाणी असलेला मांडव अजूनही तसाच आहे. मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा आणि त्यामागे ‘आमरण उपोषण’ असे लिहिलेला बॅनर आजही तसाच आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशात सुरू असली तरीही अंतरवाली सराटीमध्ये मात्र शांतता कायम आहे. तिथे गेल्या सात महिन्यांपासून उभा असलेला हा मांडव मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल १७ दिवस केलेल्या उपोषणाची आठवण करून देतो आहे.

शुक्रवारी (२६ एप्रिल) निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. मात्र, आजतागायत एकही राजकारणी गावकऱ्यांकडे मते मागण्यासाठी फिरकू शकलेला नाही. दुपारी लहान मुले या मांडवाचा वापर खेळण्यासाठी करतात. मात्र, आरक्षण लढ्याचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी आंदोलनस्थळी दररोज रात्री नियमितपणे गावकरी जमतात आणि भक्तिगीते म्हणतात.

हेही वाचा : निवडणूक रणसंग्रामात ‘राम नाम’ नाही, तर ‘या’ नावांची घोषणा; छोट्या पडद्यावरील रामाचा विजय होणार का?

मनोज जरांगे पाटील सध्या कुठे आहेत?

आंदोलनाचा मुख्य चेहरा व नेतृत्व असलेले मनोज जरांगे पाटील सध्या अंतरवाली सराटीमध्ये नाहीत. ते सध्या कुठे आहेत, याची गावकऱ्यांनाही नक्की माहिती नाही. मात्र, ते भाजपाविरोधात प्रचार करण्यासाठी राज्यभर दौऱ्यावर असल्याचे इथले गावकरी सांगतात. भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे विधेयक पारित केल्यानंतर हा मुद्दा शमविण्यात थोडे तरी यश महायुती सरकारला आले आहे. मात्र, मराठा समाजाला आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या असल्याचे वाटत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही ज्वलंत असून, तो या निवडणुकीतही निर्णायक ठरणार आहे.

अंतरवाली सराटीमधील २५-३० टक्के लोक हे मराठा समाजाचे आहेत. मनोज जरांगे पाटील सध्या कुठे आहेत, याची नेमकी माहिती गावकऱ्यांना नाही. ते गावात नसले तरीही आम्ही मांडवात जमत राहू, असे गावकरी सांगतात. या संदर्भात बोलताना गावातील शिवाजी तारक म्हणाले, “मराठा आरक्षणाची मागणी आणि आमचे आंदोलन संपलेले नाही. सध्या आचारसंहितेमुळे आम्ही शांत आहोत. ८ जून रोजी आम्ही एक प्रचंड सभा घेणार आहोत.” दुसरीकडे, गावकऱ्यांनी कशा प्रकारे मतदान करावे, याच्या कसल्याही सूचना त्यांना मिळालेल्या नसून जरांगे पाटील यांचे हे आंदोलन निवडणुकीशी संबंधित नसल्याचेही काही गावकरी सांगतात.

अंतरवाली सराटीमधील मराठेतर लोकही असेच सांगताना दिसतात. गावकरी लक्ष्मण बोढे म्हणाले, “आम्ही एकोप्याने राहतो. आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज या दोघांचीही जयंती अलीकडे तितक्याच उत्साहाने साजरी केली. गावात तुम्हाला सगळीकडे निळे आणि भगवे झेंडे एकत्र लावलेले दिसतील.” मात्र, ते आरक्षण या मुद्द्यावर फार काही खुलेपणाने बोलले नाहीत. “ज्यांना या विषयाबद्दल चांगली माहिती आहे, तेच नेते याबद्दल बोलू शकतील.” असे गावकरी आप्पा चाबूकस्वार म्हणाले. मराठा आरक्षण मिळण्यामध्ये होत असलेली दिरंगाई मात्र चर्चेचा विषय आहे. एकनाथ शिंदे सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणावर मत विचारले असता, ते म्हणाले, “हे टिकणारे आरक्षण नाही. न्यायालयात पुन्हा तेच होणार आहे.” मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग कायद्यांतर्गत देण्यात आलेल्या राखीव जागा या ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडतात. मुंबई उच्च न्यायालयामध्ये या आरक्षणाविरोधात अनेक जनहित याचिका दाखल झालेल्या आहेत.

राजकीय पटलावर काय उमटणार पडसाद?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर काय होईल, हा एक चर्चेचा विषय आहे. मराठवाडा भागातील लोकसभेच्या आठ जागांपैकी परभणी मतदारसंघामध्ये अंतरवाली सराटी हे गाव येते. २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये परभणीची जागा शिवसेनेचे उमेदवार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी जिंकली होती. ते सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या गटाकडून याच मतदारसंघातून उभे आहेत. मराठवाड्यातील इतर मतदारसंघांचा विचार केल्यास, बीड, लातूर, जालना व नांदेड या चार जागा भाजपाने जिंकल्या होत्या; तर हिंगोली व उस्मानाबादची जागा तेव्हाच्या शिवसेनेने जिंकली होती. औरंगाबादची जागा एआयएमआयएम पक्षाकडे आहे.

परभणी, हिंगोली व नांदेड या जागांसाठी शुक्रवारी (२६ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. उस्मानाबाद व लातूरसाठी ७ मे रोजी, तर बीड, जालना व औरंगाबादसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये परभणीमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे संजय जाधव आणि महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीही या जागेवरून निवडणूक लढवीत असून, हवामानाचा अचूक अंदाज सांगण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पंजाबराव डंख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे संजय जाधव हे मराठा समाजाचे; तर महादेव जानकर हे धनगर (ओबीसी) समाजाचे आहेत. अगदी अलीकडेच जानकर यांनी महायुतीमध्ये प्रवेश करीत ही उमेदवारी मिळवली आहे. त्यांची ही उमेदवारी म्हणजे राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रमुख शरद पवार यांना धक्का मानला जातो. कारण- मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागे शरद पवार यांचाच हात असल्याचे अनेकांना वाटते. या आंदोलनामुळे राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यामधील संघर्ष वाढल्याचे चित्र आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी ओबीसींची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर परभणीच्या जागेवर महादेव जानकर यांना देण्यात आलेली उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे. ते धनगर (ओबीसी) समाजाचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा : पाणी द्या, मतं घ्या : १० वर्षे पाण्यासाठी तरसलेल्या ग्रामीण मतदारांचा पवित्रा

“मनोज जरांगे पाटील सांगतील तेच करू”

अंतरवाली सराटीतील काही जण मराठा समाजाचे असूनही महादेव जानकर यांना मत देणार असल्याचे सांगतात. “केंद्रातील सत्ता मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींनी दिलेला उमेदवारच निवडू”, असे काही गावकऱ्यांनी म्हटले आहे; तर “मोदींनी मराठा समाजासाठी काय केले आहे”, असा प्रश्नही काहींनी विचारला. काही जण, संजय जाधव हे मराठा समाजाचे असल्याने त्यांनाच मतदान करणार असल्याचे सांगतात. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बहुतांशी खासदार एकनाथ शिंदेंच्या गटात गेले. मात्र, खासदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलेल्या मोजक्या खासदारांमध्ये संजय जाधवही आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत सहानुभूतीचीही भावना आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांचा फायदा त्यांना होऊ शकतो, असे म्हटले जाते.

काही गावकरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब उत्तम डंख यांनाही मत देण्यास तयार आहेत. मनोज जरांगे पाटील सध्या जरी गावात नसले तरी ते सांगतील त्याच पद्धतीने आपण पुढे जायचे, असे गावाने ठरवले आहे. परभणीची जागा जिंकणे थोडे कठीण जाणार असल्याचे भाजपाचे नेते मान्य करताना दिसतात. मात्र, पक्ष इतर जागा नक्की जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपाला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation protest manoj jarange patil antarwali sarathi politics vsh
First published on: 24-04-2024 at 16:51 IST