लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे अखेरचे चार टप्पे उरले असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केल्यामुळे भाजपविरोधातील विरोधकांचा प्रचार अधिक धारधार आणि तितकाच रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रीय स्तरावर मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी व प्रियंका गांधी-वाड्रा, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रात शरद पवार व उद्धव ठाकरे असे ‘इंडिया’तील प्रामुख्याने सहा नेते भाजप व मोदींना तगडे प्रत्युत्तर देत आहेत. त्यामध्ये अचूक वेळी मुरब्बी केजरीवालांची भर पडली आहे. दिल्लीमध्ये २५ मे रोजी मतदान होणार असून पुढील १३ दिवसांमध्ये भाजपविरोधात केजरीवालांच्या आक्रमकतेचा नवा अवतार पाहायला मिळू शकेल. केजरीवालांसाठी भाजप म्हणजे एखाद्या सावजासारखे असेल. केजरीवालांना मिळालेला जामीन ‘इंडिया’साठी वरदान ठरण्याची शक्यता मानली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कथित मद्यविक्री घोटाळा प्रकरणात पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या तोंडावर केजरीवालांना ‘ईडी’ने अटक केल्यामुळे आम आदमी पक्ष कमालीचा हतबल झाला होता. काँग्रेससह ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या मानसिक खच्चीकरणाचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात होता. अटकेपूर्वी केजरीवालांनी दिल्ली, गुजरातसह मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये लोकसभेच्या प्रचाराला वेग दिला होता. दिल्लीमध्ये काँग्रेस व ‘आप’ची आघाडी झाली असून इथेही केजरीवालांनी भाजपविरोधात टोकदार प्रचार सुरू केला होता. केजरीवालांच्या अटकेमुळे ‘आप’च्या प्रचाराची घोडदौड अचानक खंडित झाली. आता केजरीवाल जोशात दिल्लीमध्ये प्रचार करू शकतील. त्यामुळे दिल्लीत ‘आप’च्या ताकदीवर अवलंबून असलेल्या काँग्रेसलाही बळ मिळाले आहे.

हेही वाचा : रायबरेलीत प्रचार करताना प्रियांका गांधी का काढत आहेत १९२१ च्या हत्याकांडाची आठवण?

केजरीवालांना अटक करून भाजपने राजकीय कुऱ्हाड पायावर मारून घेतल्याचे मानले जात होते. अवघ्या काही दिवसांवर मतदान आले असताना अटक करून भाजपने केजरीवालांवर अन्याय केल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली होती. हाच मुद्दा पकडून ‘आप’नेही मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. जामिनावर सुटलेले संजय सिंह, आतिशी, सौरभ भारद्वाज आदी आपच्या नेत्यांनी भाजपकडून होणाऱ्या ‘तोफगोळ्या’नंतरही ‘आप’चा किल्ला कोसळू दिला नाही. ‘आप’ला खिंडार पाडण्याचे भाजपचे प्रयत्नही केजरीवालांच्या सहकाऱ्यांनी हाणून पाडले. शिवाय, केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल थेट मैदानात उतरून ‘आप’चे नेतृत्व करून लागल्याने भाजपला ‘आप’वर दबाव टाकण्यात फारसे यश आले नाही. सुनीता केजरीवाल ‘आप’च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिल्लीभर फिरत असून लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे दिल्लीतील सातही जागांवर तगडी लढाई होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

हेही वाचा : हार-पुष्पगुच्छांचा खच, अभिवादनाचे हजारो हात, भाजप-मोदींच्या जयघोषात प्रचारफेरी..

लोकसभेची निवडणूक उत्तरेकडे सरकू लागली असून उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा या प्रमुख राज्यांमध्ये केजरीवालांचे झंझावती दौरे होण्याची शक्यता आहे. केजरीवाल थेट प्रचारात सहभागी होणार असल्याने प्रामुख्याने दिल्ली व पंजाबमध्ये ‘आप’ला मोठा फायदा होऊ शकतो. उत्तर प्रदेशमध्ये ‘आप’ची ताकद नसली तरी ‘इंडिया’च्या वतीने केजरीवालांच्या काही प्रचारसभा घेतल्या जाऊ शकतात. हरियाणामधील भाजप सरकार अडचणीत आले असून लोकसभेच्या किमान पाच जागांवर भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हरियाणामध्ये केजरीवालांचा प्रभाव असल्याने तिथेही त्यांच्या प्रचारसभांचा काँग्रेसला लाभ मिळवता येऊ शकेल. टप्प्यागणिक भाजपच्या प्रचाराची दिशा बदलत आहे. राम मंदिर आणि विकासाच्या मुद्द्यापासून फारकत घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण, अनुसूचित जाती-जमाती व ओसीबी आरक्षण आणि आता तर अंबानी-अदानींच्या कथित काळा पैसा असा कुठल्या कुठे प्रचार नेऊन ठेवला आहे. दिल्लीत केजरीवालांकडून मोदींच्या प्रत्येक मुद्द्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाऊ शकते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court interim bail to delhi cm arvind kejriwal ahead of lok sabha polls print politics news css
Show comments