Congress Campaign In Rae Bareli: अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारीबाबत काँग्रेसने बराच वेळ घेतला आणि सरतेशेवटी रायबरेलीतून राहुल गांधी यांना तर अमेठीतून काँग्रेस कार्यकर्ते किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. रायबरेलीतून प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवतील, अशी चर्चा सर्वत्र होती, मात्र ती फोल ठरली. अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ नेहरु-गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ मानले जातात. विशेषत: रायबरेलीबरोबर नेहरु घराण्याचे नाते १०० वर्षे जुने असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येते. दुसरीकडे २०१९ साली अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर काँग्रेसचा हा बालेकिल्ला भाजपाच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे रायबरेली मतदारसंघ राखून ठेवणे आणि अमेठी पुन्हा ताब्यात घेण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत. दुसरीकडे निवडून आल्यानंतर काँग्रेसचे कुणीही या मतदारसंघाकडे लक्ष देत नाही, असा आरोप भाजपाकडून केला जातो आहे. भाजपाच्या या प्रचाराला उत्तर देण्यासाठी प्रियांका गांधीही रायबरेलीतील प्रचारावर लक्ष ठेवून आहेत.

विशेषत: रायबरेली मतदारसंघासाठी काँग्रेसने वेगळी रणनीती आखली आहे. राहुल गांधींनी इथे प्रचारास सुरुवात करण्यापूर्वीच ‘सेवा के सौ साल’ आणि ‘रायबरेली के राहुल’ अशी प्रचारमोहीम काँग्रेसकडून लवकरच राबवली जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. प्रियांका गांधीही रायबरेलीवर विशेष लक्ष ठेवून असून रायबरेलीतील प्रचारामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. याआधी सोनिया गांधी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायच्या. गेल्या चार निवडणुकांपासून प्रियांका गांधींनी आपल्या आईसाठी या मतदारसंघामध्ये प्रचार केला आहे.

हेही वाचा : भाजपाला समर्थन देणारे आणखी १० आमदार काँग्रेसच्या संपर्कात? हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

प्रियांका गांधींनी गेल्या दोन दिवसांपासून बछरावन आणि रायबरेली सदर विधानसभा क्षेत्रामध्ये २५ हून अधिक कोपरा सभा घेतल्या आहेत. त्यांनी या सभांमध्ये इतिहासातील एका घटनेचा दाखला दिला आहे. ७ जानेवारी १९२१ रोजी ब्रिटिशांनी केलेल्या मुंशीगंज हत्याकांडांचा वारंवार उल्लेख करत मोतीलाल नेहरु आणि जवाहरलाल नेहरुंपासून गांधी घराणे या मतदारसंघातील लोकांबरोबर कशाप्रकारे सातत्याने उभे राहिले आहे, हे सांगण्यावर त्यांनी भर दिला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, “नेहरु-गांधी घराण्याचे रायबरेलीबरोबर असलेले संबंध १०० वर्षे जुने आहेत. १९२१ साली ब्रिटिशांनी केलेल्या हत्याकांडाविरोधात मोतीलाल नेहरु आणि जवाहरलाल नेहरु शेतकऱ्यांबरोबर उभे राहिले होते. हा असहकार आंदोलनाचा काळ होता. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दिला म्हणून जवाहरलाल नेहरूंनाही अटक करण्यात आली होती. “या निवडणुकीसाठी रायबरेलीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झालेल्या पहिल्या बैठकीमध्येही प्रियांका गांधी यांनी ही घटना सांगितली होती. गेल्या बुधवारीही (८ मे) बछरावनमधील एका कोपरा सभेत त्या म्हणाल्या की, “तुमची हाक ऐकून आम्ही इथे आलो होतो. मोतीलाल आणि जवाहरलाल नेहरु इथे आले आणि काय घडले आहे, ते त्यांनी पाहिले होते. तेव्हापासून आम्ही तुमच्याबरोबर आहोत. चार पिढ्या सरल्या असल्या तरीही आम्ही तुमच्याबरोबर जोडले गेलेलो आहोत.”

रायबरेलीतील लोकांबरोबरचे आपले भावनिक नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न प्रियांका गांधी करत आहेत. त्यांनी गुरुवारी (९ मे) आपल्या प्रचाराची सुरुवातदेखील मुन्शीगंजच्या शहीद स्मारकापासून केली. पासी समाजातील एक शेतकरी नेता इंग्रजांविरोधात कसा उभा राहिला याची कथा सांगण्यासाठीही काँग्रेसकडून या घटनेचा उल्लेख वारंवार करण्यात येतो आहे. आपल्या भाषणांमध्ये प्रियांका गांधी आणखीही काही मुद्द्यांवर भाष्य करत आहेत. इंदिरा गांधी यांचा रायबरेलीतून पराभव झाला होता. त्यानंतर त्या पुन्हा याच मतदारसंघातून निवडूनही आल्या होत्या. या इतिहासाचा संदर्भ देत प्रियांका गांधी म्हणाल्या की, “आमच्याकडून चुकाही झाल्या आहेत, मात्र आम्ही त्यातून शिकलोही आहे. १९५२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेसने ७२ पैकी ६६ वर्षे रायबरेली लोकसभा मतदारसंघातील लोकांची काळजी घेतली आहे.”

हेही वाचा : गांधी घराण्याचे सेवक ते सोनिया गांधींचे स्वीय सहाय्यक; स्मृती इराणीं

गुरुवारी (९ मे) एकीकडे प्रियांका गांधी बछरावनमध्ये कोपरा सभेच्या माध्यमातून रायबरेलीच्या लोकांबरोबर असलेले आपले ऐतिहासिक संबंध सांगत होत्या; तर दुसरीकडे त्या ठिकाणापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर भाजपाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंग आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश चंद तिवारी कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेत होते. त्यांनी या बैठकीत आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की, गांधी कुटुंबीय निवडणुकीपुरतेच या मतदारसंघात येते आणि निवडून आल्यानंतर गायब होते.

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश चंद तिवारी म्हणाले की, “इथले स्थानिक नेते दिनेश प्रताप सिंग हेच तुमच्याबरोबर तुमच्या सुख-दुःखात कायम असणार आहेत.” रायबरेलीमध्ये दिनेश प्रताप सिंग यांनी ‘मैं चिराग हूँ तुम्हारा’ अशा आशयाची प्रचारमोहीम चालवली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ भाजपाला मिळवून देण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.