या वर्षाच्या शेवटी तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. सध्या येथे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाची सत्ता असून मुख्यमंत्रिपदी के चंद्रशेखर राव (केसीआर) हे आहेत. बीआरएस पक्षाची सत्ता उलथवून लावण्यासाठी येथे काँग्रेस आणि भाजपा पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवलेली आहे. या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने वेगवेगळी आश्वासने दिली होती. तेलंगणामध्येही काँग्रेस पक्षाकडून कर्नाटक राज्याप्रमाणेच राजकीय डावपेच आखले जात असून येथे आकर्षक आश्वासनं दिली जात आहेत. विशेष म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळावे म्हणून अनेक नेतेमंडळींनी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केले आहेत. ५०० रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन काँग्रेसच्या नेत्यांकडून तेलंगणाच्या मतदारांना वेगवेगळी आश्वासने दिली जात आहेत. यामध्ये ५०० रुपयांना गॅस सिलिंडर देण्यापासून ते घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यापर्यंतच्या आश्वासनांचा समावेश आहे. या आश्वासनांचे ठिकठिकाणी थेट पोस्टर्स लावले जात आहेत. काँग्रेसने कर्नाटक राज्यातही सगळीकडे अशाच प्रकारची पोस्टरबाजी केली होती. कर्नाटकच्या विजयामुळे तेलंगणातही आम्ही बाजी मारू अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांना आहे. येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे. म्हणूनच की काय उमेदवारी अर्ज मिळावा म्हणून अनेक नेतेमंडळी आपापल्या पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणा काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करणारे ११९ जागांसाठी १००० अर्ज आले आहेत. उमेदवार निवडीची प्रक्रिया म्हणून तेलंगणाच्या प्रदेश काँग्रेसने हे सर्व अर्ज दिल्लीला पाठवले आहेत. बीआरएस पक्षाने तिकीट नाकारलेल्या नेत्यांचेही अर्ज काँग्रेसच्या सूत्रांनुसार काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पक्षांचे नेतेसुद्धा तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये बीआरएस पक्षाने तिकीट नाकारलेल्या नेत्यांचाही समावेश आहे. खानापूर येथील बीआरएसच्या विद्यमान आमदार रेखा अजमीरा यांनीही काँग्रेसकडे तिकीटासाठी अर्ज केला आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने काही जागांवर विजय मिळवला होता. विशेषत: खम्मम प्रांतातील एकूण १९ जागांवर काँग्रेसने बाजी मारली होती. मात्र त्यातील १३ आमदार नंतर बीआरएस पक्षात गेले होते. याच जागांसाठी तिकीट मिळावे म्हणून जास्त अर्ज आलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही काही जागांसाठी चक्क ३०-३० अर्ज आले आहेत. इच्छुक उमेदवारांकडून पोस्टरबाजी, आश्वासनांचा पाऊस ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून आपापल्या भागात पोस्टरबाजी केली जात आहे. या पोस्टर्सच्या माध्यमातून मतदारांना वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. यामध्ये महिलांना मोफत प्रवास, बेरोजगार युवकांना आर्थिक मदत, गॅस सिलिंडरसाठी अनुदान, पेन्शनमध्ये प्रति महिना ४ हजार रुपयांपर्यंत वाढ, घर बांधण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य आदी आश्वासनांचा समावेश आहे. पोस्टर्सवर मागासवर्ग, मुस्लीम, ख्रिश्चन धर्मीयांसाठी वेगवेगळी आश्वासने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या विकासासाठी एकूण १२ आश्वासनांचा संच तयार केला आहे. तेलंगणातील इच्छुक उमेदवारांकडून यातीलच काही आश्वासनांचे पोस्टर्स लावले जात आहेत. काही पोस्टर्सवर मागासवर्ग, मुस्लीम, ख्रिश्चन धर्मीयांसाठीदेखील वेगवेगळी आश्वासने देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या पोस्टर्सवर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्यासह अन्य नेत्यांचे फोटो आहेत. प्रियांका गांधी यांच्या आश्वासनांचा संदर्भ याच पोस्टर्स आणि आश्वासनांबाबत काँग्रेसचे कार्यकर्ते रघुनाथ यादव यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची तेलंगणामध्ये चांगलीच चर्चा होत आहे. मला वाटते की या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची संख्या निश्चित वाढेल, असे रघुनथ यादव म्हणाले. यादव यांनीदेखील निवडणूक लढवण्यासाठी तिकीट द्यावे, असा अर्ज प्रदेश काँग्रेसकडे केला आहे. यादव यांनी प्रियांका गांधी यांनी ८ मे रोजी घेतलेल्या एका सभेचा आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांचाही संदर्भ दिला. काँग्रेसने मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना अनेक आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांमुळे मतदार आकर्षित होत आहेत. प्रियांका गांधी यांनी ८ मे रोजी एका सभेत तरुणांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. तेलंगणामध्ये आम्ही सत्तेत आल्यास तरुणांकडून कोणतेही व्याज न घेता १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देऊ, विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक स्कुटर देऊ, तसेच तरुणांना बेरोजगार भत्ता म्हणून ४००० रुपये देऊ, असे सांगितले होते, अशी माहिती यादव यांनी दिली.