पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत अकार्यक्षम कारभार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त अर्थव्यवस्थेमध्येच नाही तर इतरही अनेक आघाड्यांवर अकार्यक्षम ठरले (The Modi regime’s staggering incompetence) असल्याचा खळबळजनक दावा डॉ. परकला प्रभाकर यांनी The Crooked Timber Of New India : Essays on a Republic in Crisis या आपल्या नव्या पुस्तकात केला आहे. ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी ‘द वायर’ या संकेतस्थळाच्या यूट्यूब चॅनेलवर डॉ. परकला प्रभाकर यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये डॉ. प्रभाकर यांनी पुस्तकातील खळबळजनक दाव्याबाबत आपली स्पष्ट आणि सडेतोड मते व्यक्त केली. “पंतप्रधान मोदी अनेक बाबतींत अकार्यक्षम असले तरी काही बाबतीत ते कार्यक्षम आहेत. समाजात फूट पाडणे, जातीय विद्वेष निर्माण होईल, असे वातावरण तयार करणे याबाबत ते कार्यक्षम ठरल्याचे देशातील घटनांवरून दिसते,” असा खळबळजनक दावा डॉ. प्रभाकर यांनी केला.

पत्रकार करण थापर यांनी, हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश काय होता, असा प्रश्न विचारला. त्यावर डॉ. प्रभाकर म्हणाले की, देशात चाललेल्या चुकीच्या घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. आपला देश सध्या चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. प्रजासत्ताक भारताने जी तत्त्वे आणि मूल्ये आखून दिली होती, त्यांपासून आपण दूर चाललो आहोत. देशात सध्या जे काही चालू आहे, त्यावरून मला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. तुम्ही टीका का करत आहात? तुम्हाला काहीच चांगले दिसत नाही का? मग आपल्याकडे पर्याय काय आहेत? असे प्रश्न मला विचारण्यात येतात. मी त्या सर्वांना सांगतो की, पर्याय काय असेल हे लोक ठरवतील. मी आणि तुम्ही नाही. मी फक्त देशात काय चुकीचे सुरू आहे ते लोकांसमोर मांडू इच्छितो आहे.

sharad ponkshe reacts on Swatantra Veer Savarkar movie
शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”
Senior minister Chhagan Bhujbal is again in discussion in the background of Lok Sabha elections delhi
दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह…
uddhav thackeray Amit shah
उद्धव ठाकरेंचा भाजपाला दणका, नाराज खासदाराचा उद्या ठाकरे गटात प्रवेश; सुषमा अंधारेंची माहिती
JNU Vice Chancellor Santishree Pandit
“नेहरू, इंदिरा गांधी मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती

या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ पत्रकार यांनी टोकदार प्रश्नांच्या माध्यमातून लेखक परकला प्रभाकर यांच्याकडून पुस्तकातले सार मुद्देसूदपणे काढून घेतले आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबत डॉ. प्रभाकर यांनी पुस्तकात जे दावे केले आहेत, ते मोदी सरकार करत असलेल्या दाव्यांच्या नेमके विरोधात आहेत. मोदी सरकारचे मंत्री अर्थव्यवस्थेबाबत जो आशावाद व्यक्त करत आहेत आणि पुस्तकात प्रभाकर यांनी जी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला, त्यात विसंगती कशी काय? असा प्रश्न थापर यांनी विचारला.

या प्रश्नाचे उत्तर देत असताना प्रभाकर म्हणाले की, सरकारचे प्रतिनिधी किंवा मंत्री हे चुकीची माहिती लोकांसमोर ठेवत आहेत. यासाठी त्यांनी Gaslight हा शब्द वापरला. प्रभाकर म्हणाले की, करोना महामारीआधी असलेला आपला जीडीपी आणि आजच्या जीडीपीमध्ये खूप अंतर आहे. आपण महामारीच्या आधीचा जीडीपी अद्याप गाठलेला नाही.

महामारीच्या आधीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला होता. मी म्हणणार नाही की, मंदी होती, पण वेग निश्चित कमी होता. या काळात आपण चुकीची धोरणे अवलंबली आहेत. भारतीय जनता पार्टीकडे सुरुवातीपासून आर्थिक तत्त्वज्ञान किंवा तसा सुसंगत विचार नव्हता. (Since the beginging Bhartiya Janata Party did not have a coherent, well thought of Economic philosophy) मी कुणा एका व्यक्तीबद्दल हे बोलत नाही. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत सध्या संकटाचा सामना करत आहे.

“भाजपाची १९८० साली जेव्हा स्थापना झाली, तेव्हा त्यांनी गांधींचे विचार आणि समाजवादाला विरोध केला होता. १९९१ साली नव्या आर्थिक सुधारणांनाही त्यांनी विरोध केला, जे फार गंभीर होते. आज मोदी सरकारला कोणते अर्थतज्ज्ञ (voodoo economist) सल्ला देत आहेत, याची मला कल्पना नाही. कोणत्या अर्थतज्ज्ञांचा सल्ला ऐकून त्यांनी निश्चलनीकरणासारखा आपत्तिजनक आणि अव्यवहार्य निर्णय घेतला, हे कळले नाही. काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. पण तुम्ही कोणत्याही अर्थतज्ज्ञाला विचारा, काळा पैसा हा रोखीमध्ये असतो का?” असा प्रश्न डॉ. प्रभाकर यांनी या मुलाखतीदरम्यान उपस्थित केला.

अरुण जेटली, निर्मला सीतारमन अकार्यक्षम आहेत का?

मोदी यांच्या पंतप्रधानकाळात आधी अरुण जेटली अर्थमंत्री होते, त्यानंतर निर्मला सीतारमन अर्थमंत्री झाल्या. हे दोन्ही नेते अर्थमंत्री म्हणून अकार्यक्षम आहेत का? असाही प्रश्न पत्रकार करण थापर यांनी विचारला असता, डॉ. प्रभाकर म्हणाले की, मी कुणाही एका व्यक्तीकडे अंगुलिनिर्देश करणार नाही. हा विषय कुणाही एका व्यक्तीबद्दलचा नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरेन, कारण ते या सरकारचे प्रमुख आहे. देशात चाललेल्या बऱ्या-वाईट घटनांना ते थेट जबाबदार आहेत.

मोदी सरकारच्या काळात सर्वच चुकीचे घडले असे मी म्हणणार नाही. महागाईचा दर सध्या सहा ते सात टक्क्यांच्या घरात आहे. पण बेरोजगारीचा दर सात टक्क्यांच्या वर गेला आहे. युवकांच्या बेरोजगारीचा आकडा यापेक्षा अधिक आहे. अशा वेळी डिजिटल व्यवहारांमध्ये झालेली वाढ, काही घटकांना दिलेले अनुदान अशा चांगल्या बाबी आणि समस्या एकाच चष्म्यातून पाहता येणार नाहीत. महागाई, युवकांची बेरोजगारी हे आपल्यासमोरचे उग्र प्रश्न आहेत. अशा वेळी सरकारी संस्थांचे होणारे खासगीकरण, मागणी आणि पुरवठा यांमध्ये झालेला कमालीचा गोंधळ यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत कमालीची अनागोंदी माजली आहे, असे मत डॉ. परकला प्रभाकर यांनी व्यक्त केले.