महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा शीला काळे यांना यंदाचा नरुभाऊ लिमये स्मृती आयर्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
एस. एम. जोशी सभागृह येथे रविवारी (२९ जून) सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती मुद्रणालयाचे संचालक अंकुश काकडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. नरुभाऊ लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार प्रदान केला जातो. ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक पराग करंदीकर आणि साहित्य शिवारचे संपादक जयराम देसाई यांच्या निवड समितीने यंदाच्या पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे अंकुश काकडे यांनी सांगितले.