लग्नानंतर मूल जन्माला घालणं बंद केलं पाहिजे असं रोखठोक मत अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. “मूल जन्माला आले की वस्तूंचा वापर सुरु होतो. पर्यावरणात बदल होत असताना त्याचे संवर्धन करण्यासाठी आता नियम बदलले पाहिजेत. देशाची वाढलेली लोकसंख्या आपण रोखू शकत नाही मात्र लग्न केल्यानंतर मूल झालंच पाहिजे हा आग्रह सोडायला हवा असं मत अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. माझ्या लग्नाला २२-२३ वर्षे झाली मात्र मूल जन्माला येऊ दिले नाही त्यासाठी हे एक कारण आहे” असंही अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
मनोविकास प्रकाश आयोजित आणि अतुल देऊळगावकर लिखित ‘ग्रेटाची हाक, तुम्हाला ऐकू येते आहे ना?’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे विचार मांडले. ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लेखक अतुल देऊळगावकर, चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे, अरविंद पाटणकर, आशिष पाटकर यांचीही या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थिती होती.
यावेळी अतुल कुलकर्णी म्हणाले, ” जिवंत असलेल्या पिढीने येणाऱ्या पिढीला खाईत लोटलं आहे. मागे वळून पाहताना आपले काय चुकले हे लक्षात आल्यानंतरही आपण वेगळा विचार करणार आहोत का? यशाच्या व्याख्या आपण जशाच्या तशा येणाऱ्या पिढीवर लादणार आहोत? आता वेळ आली आहे की होय आमचं चुकलं हे मान्य करण्याची. गाडी, बंगला हे महत्त्वाचे वाटत आहे. स्पर्धेला महत्त्व दिलं आहे. आजकाल खूप स्पर्धा आहे, असा पालकांमध्ये चर्चेचा विषय असतो. हेच आपण मुलांना शिकवतोय. आजकाल बिझी असणं हे यशस्वी असल्याचं लक्षण मानलं जातं आहे ”
स्वीडन, नॉर्वे या देशातल्या विद्यार्थ्यांना पुस्तकांमधून लिंगभेद, जातीभेद शिकवला जा नाही. निसर्गाचा आणि लोकशाहीचा आदर कसा करायचा हे सांगितलं जातं. त्यामुळेच तिथली मुलं अधिक समंजस आहेत. आपल्याकडे शिक्षणातून निसर्ग संवर्धनाचे धडे दिले पाहिजेत. आता विज्ञान न सांगता प्रत्यक्ष कृती शिकवली गेली पाहिजे असं मत अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं.