‘सध्या एखाद्याचे वाभाडे काढणे म्हणजेच राष्ट्रकार्य अशी काहीशी सामाजिक भावना झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वाना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ. हेडगेवारांसारख्या व्यक्तिमत्त्वाची आजच्या पिढीला ओळख होणे आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी रविवारी व्यक्त केले.मृण्मयी प्रकाशनच्या वतीने गो. नी. दांडेकर लिखित ‘वादळातील दीपस्तंभ’ या कादंबरीचे पुन:प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर ही कादंबरी आधारलेली आहे. या वेळी ज्येष्ठ लेखक द. मा. मिरासदार, पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, पुणे शहराचे संघचालक बापूसाहेब घाटपांडे, डॉ. विजय देव आणि डॉ. वीणा देव आदी उपस्थित होते.या वेळी राजदत्त म्हणाले, ‘सध्या सगळीकडे कल्लोळ आहे. सगळे राजकीय पक्ष हे एकमेकांचे वाभाडे काढायला आसुसले आहे. अशा परिस्थितीत तरुण पिढीसाठी एखाद्या दीपस्तंभाचीच आवश्यकता आहे. डॉ. हेडगेवारांसारख्या व्यक्तीचे चरित्र तरुण पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती गेली, तरी तिने उभे केलेले कार्य आणि पेरलेले विचार जिवंत राहतात, याचेच उदाहरण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे.’या वेळी मिरासदार म्हणाले, ‘एखाद्या व्यक्तीचे चरित्र हे ललित शैलीत मांडल्यास ते अधिक भावते. कारण ललित लेखनात छोटय़ा छोटय़ा प्रसंगांमधून व्यक्तीची भावनिक जडणघडणही लक्षात येते. त्यामुळेच मोठय़ा व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देण्यासाठी अशा कादंबऱ्यांचे प्रकाशन होणे गरजेचे आहे.